करोना विषाणुमुळे जगभरातील बाजार पेठ ठप्प झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका कृषी विभागाला बसला आहे. त्यामुळे येत्या काळात पुढील लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यास, कृषी विभागासाठी लॉकडाउन नसणार आहे. अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच, आता शेतकर्‍यांनी अधिकधिक काम करण्यासाठी निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात पुढील लॉकडाउन जाहीर झाल्यास कृषी विभागास अधिकच फटका बसण्याची शक्यता आहे.  या प्रश्नावर कृषीमंत्री दादा भुसे यांनी भूमिका मांडली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आली होते. त्यानंतर कृषीमंत्री दादा भुसे यांनी पत्रकाराशी संवाद साधला. त्यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे देखील उपस्थित होते.

यावेळी कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले, करोना विषाणुचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. शेतकरी पुन्हा उभा राहण्याच्या दृष्टीने विशेष उपाय योजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रासायनिक खते उपलब्ध करून दिली जात आहेत. 50 हजार मेट्रिक टन बफर स्टॉक तयार करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्णय देखील घेतला आहे. तर काही ठिकाणी शेतकर्‍यांना कर्ज वाटप देखील झाले असल्याचे त्यांनी सांगितले.  आगामी काळ लक्षात घेता कापूस, कांदा, मका यासह इतर माल खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही ते म्हणाले. याचबरोबर शेतमाल वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी –
राज्यातील अमरावती जिल्ह्यात टोळधाडमुळे एक वेगळेच संकट कृषी विभागा समोर निर्माण झाला आहे. त्यादृष्टीने कृषी विभागा मार्फत टोळधाड किड्याचा आता पर्यंत 50 टक्के नायनाट करण्यात यश आले आहे. अद्यापही त्या भागात टोळधाड असल्याने, अग्निशमन बंब, त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी करून, तेथील शेतीवरील संकट नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न असणार आहे. अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली.