मागील आठवड्यात पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली करण्यात आली. राम यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पुणे जिल्हाधिकारी पदाचा पदभार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, करोनाशी लढा देत असलेल्या पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी कोण येणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून, तीन अधिकाऱ्यांची नावं सध्या स्पर्धेत आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. करोनामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक असतानाच नवल किशोर राम यांची पुणे जिल्हाधिकारी पदावरून बदली झाली. राम हे काल (९ ऑगस्ट) पंतप्रधान कार्यालयातील पदाचा पदभार घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांच्याकडे देण्यात आला आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी हा निर्णय घेतला असून, तसे आदेश जारी करण्यात आले आहेत. सौरभ राव यांनी नव्या जिल्हाधिकाऱ्यांची राज्य सरकारकडून लवकरच घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाच्या स्पर्धेत असलेल्या नावांविषयीची माहिती दिली. जिल्हाधिकारी पदासाठी तीन नावं सध्या स्पर्धेत आहेत. यात पहिलं नाव सध्याचे हाफकिन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि यवतमाळचे माजी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचं आहे. तर दुसरं नाव लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचं आहे. या स्पर्धेत तिसरं नाव योगेश म्हसे यांचं आहे. म्हसे हे सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्याचबरोबर त्यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड नवीन नगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केलेलं आहे. "हो. ही तीन नावं सध्या पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाच्या स्पर्धेत आहेत. तिन्ही अधिकारी अनुभवी आहेत," असं विभागीय आयुक्त राव यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आस्तिक कुमार पांडे यांचंही नाव पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी चर्चेत आहे.