बहुतांश भागांत गारवा अद्यापही कायम

पुणे : राज्यातील बहुतांश भागांतील किमान तापमान सरासरीच्या आसपास असल्याने गारवा कायम आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्याच्या हवामानावर परिणाम होत असून, २ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

उत्तर भारतातील जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरयाणा आदी भागांतील थंडीचे प्रवाह कायम आहेत. राज्यात शुक्रवारी विदर्भातील गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ८.४ अंश किमान तापमानाची नोंद झाली.

प्रमुख ठिकाणी मागील चोवीस तासांत नोंदविले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुढीलप्रमाणे- मध्य महाराष्ट्रातील पुणे ११.७, नगर १०.२, जळगाव ९.४, कोल्हापूर १७.०, महाबळेश्वर १३.४, मालेगाव १२.४, सांगली १२.५, सातारा १३.०, सोलापूर १५.५. कोकणातील मुंबई (कुलाबा) १९.०, सांताक्रुझ १६.४, रत्नागिरी ७.७, मराठवाडय़ातील औरंगाबाद १२.२, नांदेड १४.७, बीड १४.८, तर विदर्भातील अकोला १३.५, अमरावती १२.४, बुलढाणा १४.४, ब्रह्मपुरी १०.३, चंद्रपूर १३.६, नागपूर ९.२ आणि वर्धा १२.९.

थंडीभान..

उत्तरेकडून राज्यात येणाऱ्या शीतलहरींमुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्याच्या काही भागांत थंडीची लाट आहे. थंडीचा कडाका पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार असून, विदर्भात थंडीचा कडाका जाणवणार आहे. पुढील आठवडय़ापासून थंडीची तीव्रता कमी होत जाणार आहे. त्यानंतर तापमानात चढ-उतार सुरू राहतील.