पुण्यातील कात्रज येथील भिलारेवाडी तलावात पोहण्यास गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चार तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशामन दलाच्या जवानांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले.

अग्निशमन अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, विवेक दिपक कदम (वय १५) आणि तुषार शांताराम भांबरे (वय १६) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. कात्रज येथील भिलारेवाडी तलावात विवेक आणि तुषार हे दोघे आज दुपारच्या सुमारास पोहण्यास गेले होते. त्यावेळी दोघे तलावात बुडाले.

या घटनेची माहिती पोलिस आणि अग्नीशमन दलाला मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही मुलांना तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले आणि तत्काळ रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच दोघांना मृत घोषीत केले.