गेल्या पंधरा वर्षांत उदयनराजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही त्रास झाला असेल, तर त्याबाबत ते कधी बोलले नाहीत, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी व्यक्त केली.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीनिमित्त खासदार सुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे यांनी दिल्लीत बोलताना गेल्या पंधरा वर्षांत त्रास झाल्याबाबत प्रतिक्रिया दिली.

याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुळे म्हणाल्या, भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल उदयनराजे यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. ते संसदेत चांगले काम करतील, असा मला विश्वास आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांना काय त्रास सहन करावा लागला, याबाबत राजे कधी बोलले नाहीत. अनेक नेत्यांना सक्त वसुली संचालनालय, केंद्रीय गृन्हे अन्वेषण विभागाची भीती दाखवून पक्ष प्रवेश करुन घेतले जात आहेत. गेल्या पंधरा वर्षांत उदयनराजेंना कोणता त्रास झाला, याबाबत ते बोलले नाहीत, मात्र आताच ते झालेल्या त्रासाबद्दल बोलत आहेत.