अनधिकृत बांधकामप्रकरणी डॉ. श्रीकर परदेशी यांनी ‘लवचीक’ भूमिका घ्यायला हवी होती. वारंवार सांगूनही ऐकले नाही म्हणूनच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे लागून परदेशींची आम्ही बदली करवून घेतली, अशी कबुली माजी महापौर योगेश बहल यांनी सभेत बोलताना दिली. अधिकारी व होर्डिगचे ठेकेदार यांच्यात संगनमत असल्याचा संशय व्यक्त करून ते ठेकेदार पालिकेचे जावई आहेत का, असा मुद्दा माया बारणे यांनी उपस्थित केला.
महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखालील सभेत, खासगी कंपन्यांना खोदाई शुल्कात सवलत देण्याच्या प्रस्तावावर बोलताना बहल म्हणाले, पिंपरी पालिकेला नेहमीच चांगले अधिकारी मिळाले. दिलीप बंड धडाडीचे होते, आशिष शर्मा यांनी उत्तम आर्थिक नियोजन केले. डॉ. श्रीकर परदेशी शिस्तप्रिय तर राजीव जाधव ‘क्लीअर’ आहेत. काम करताना थोडीशी ‘लवचिकता’ ठेवावी लागते, तीच परदेशींकडे नव्हती. आम्ही अजितदादांच्या मागे लागलो, बदलीसाठी तगादा लावला, तेव्हा अजितदादांनी त्यांची बदली केली. मात्र, परदेशी असताना जी शिस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये होती, ती आता दिसत नाही. आयुक्तांनी थोडा वचक निर्माण करावा, अशी अपेक्षा बहल यांनी व्यक्त केली.
जाहिरात कराचे दर कायम ठेवण्याच्या विषयावर बोलताना सुलभा उबाळे, माया बारणे यांनी प्रशासनावर कडाडून हल्ला चढवला. अनधिकृत फ्लेक्सची पालिकेकडून दिली जाणारी आकडेवारी फसवी असल्याचे निदर्शनास आणून देत उबाळे यांनी, फ्लेक्सवाल्यांना कोणतीही नियमावली नाही का, असा मुद्दा उपस्थित केला. सामान्यांवर बोजा टाकून होडिर्ंग ठेकेदारांवर कृपादृष्टी दाखवण्याचे काम सुरू असून ते पालिकेचे जावई आहेत का, अशी विचारणा करतानाच बारणे यांनी, २४ तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा करून सामान्य नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे, अशी टीका केली. शहरातील अनधिकृत टॉवरचे सव्र्हेक्षण करून अनधिकृत टॉवर असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सभेत करण्यात आली.