उन्हाळी सुटय़ा सुरू झाल्याने राज्याच्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आता वाढली असून, खासगी प्रवासी वाहतूकदारांकडेही प्रवाशांची गर्दी दरवर्षीप्रमाणे वाढू लागली आहे. मागणी लक्षात घेता अनेक खासगी बस रस्त्यावर आणण्यात येत आहेत. त्यात नियमबाह्य़ बसचाही समावेश असल्याचे दिसून येत आहे. बसला आपत्कालीन दरवाजा गरजेचा असताना अशा प्रकारचा योग्य दरवाजा नसलेल्या बसही सध्या धावत असून, त्यांच्या तंदुरुस्ती तपासणीबाबतही संशय आहे. याबाबत संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाईची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. उन्हाळी सुटीमध्ये दरवर्षी खासगी प्रवासी वाहतूकदारांकडे प्रवाशांची गर्दी असते. प्रामुख्याने दूरच्या ठिकाणी जाण्यासाठी स्लीपर कोच प्रकारातील बसला प्रवाशांकडून पसंती दिली जात असल्याने त्यांना खासगी प्रवासी वाहतूकदाराशिवाय पर्याय नसतो. सध्या दुष्काळी स्थिती असल्याने पुण्यातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या मागील वर्षांच्या तुलनेत कमी असली, तरी पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. प्रवासी येण्या-जाण्याच्या संख्येत काहीसा फरक असला, तरी खासगी वाहतूकदारांकडे प्रवाशांकडून होणारे आरक्षण सुटीमुळे वाढले आहे. काही ठरावीक वाहतूकदारांकडून चांगल्या सुविधा असलेल्या बस प्रवाशांच्या वाहतुकीसाठी सोडण्यात आल्या असल्या, तरी मागणी वाढत जात असल्याने काही वाहतूकदार हळूहळू नियमबाह्य़ बसही रस्त्यावर आणत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक प्रवासी बसला आपत्कालीन दरवाजा गरजेचा असतो. बसमध्ये काही घडल्यास तातडीने बाहेर पडण्यासाठी या दरवाजाची गरज असते. हा दरवाजा नसल्याने प्रवासी तातडीने बाहेर पडू न शकल्याने आगीत त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना या पूर्वी घडल्या आहेत. मध्यंतरी पुण्यातील जागरूक नागरिक श्रीकांत कर्वे यांनी आपत्कालीन दरवाजाचा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यामुळे न्यायालयाने आदेश दिल्याने शेकडो प्रवासी बसला आपत्कालीन दरवाजे बसविण्यात आले होते. मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्याही बसला उजव्या बाजूला आपत्कालीन दरवाजा बंधनकारक आहे. हा दरवाजा बसविल्यास बसमधील काही आसने कमी करावी लागत असल्याने वाहतूकदारांकडून त्याबाबत टाळाटाळ केली जाते. काही बसमध्ये हा दरवाजा ठेवल्याचे केवळ दाखविले जाते. प्रत्यक्षात मात्र त्याचाकाहीही उपयोग होत नाही. ही बाब आपत्कालीन स्थितीमध्ये प्रवाशांना धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आपत्कालीन दरवाजा नसणाऱ्या बसवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. बसला प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दरवर्षी तंदुरुस्ती प्रमाणपत्र देताना आपत्कालीन दरवाजाची तपासणी केली जाते. त्यशिवाय हे प्रमाणपत्र मिळत नाही. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी योग्य दरवाजा नसतानाही बस रस्त्यावर धावत असेल, तर त्याच्या तंदुरस्ती तपासणीबाबतही शंका उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशीही मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.