आजच्या काळात नव्या पिढीची भाषा व्यामिश्र झाली आहे. सौंदर्यपूर्ण भाषेचा अभाव आहे. नव्या पिढीला भाषेचे सौंदर्य समजावण्यासाठी, नाटकाचा इतिहास, नाटकाची भाषा आणि प्रवास कळण्यासाठी वाचन रंग कट्टा उपक्रम सुरू होत आहे. मराठी रंगभूमीचं वैशिष्टय़ म्हणजे शब्दप्रधानता. नाटककाराने बेतलेल्या नाटकांतील मोठमोठी स्वगतं, पल्लेदार आणि नाटय़मय संवाद ही खासियतच जणू.. मात्र आज ‘स्क्रीन’च्या प्रभावाखाली असलेल्या आजच्या पिढीला अशा पल्लेदार नाटकांचे, भाषेचे सौंदर्यच माहीत नाही. मराठी नाटकांचे हे वेगळेपण आजच्या रंगकर्मीपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्येष्ठ रंगकर्मी आणि विद्यमान नाटय़संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार आणि रंगकर्मी दीप्ती भोगले यांनी पुढाकार घेतला आहे. तरुण रंगकर्मीना नाटकाच्या भाषेची गोडी लावण्यासाठी, मराठी भाषेचा आणि नाटकाचा पट उलगडण्यासाठी त्यांनी वाचिक रंग कट्टा हा उपक्रम हाती घेतला आहे. दर महिन्याच्या एका रविवारी हा वाचन रंग कट्टा होणार आहे. या अंतर्गत गुरुपौर्णिमेच्या मुहुर्तावर शुक्रवारी (२७ जुलै) सायंकाळी सहा वाजता कर्वेनगर येथील गिरिजा शंकर सोसायटीजवळच्या महिम्न सभागृहात अभिवाचनाचा कार्यक्रम रंगणार आहे. पहिल्या कट्टय़ावर नाटय़ संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचे वाचन केले जाणार आहे. मेधा शिधये यांनी २००० पर्यंतच्या नाटय़संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचे संकलन पुस्तक रूपाने केले आहे. त्यात पु. भा. भावे, आचार्य अत्रे, वसंत देसाई, प्रभाकर पणशीकर अशा वेगवेगळ्या काळातील नाटय़संमेलनाध्यक्षांची भाषणे वाचली जाणार आहेत. या भाषणांतून रंगभूमीचा बदलता पटही उलगडणार आहे. तसेच जयराम शिलेदार यांच्या सूरसंगत या आत्मचरित्रातील काही भागाचे वाचन केले जाणार आहे. प्रत्येक नाटककाराच्या लेखनाची, नाटकांची वैशिष्टय़े होती. त्यात काही शब्दांचा वापर, भाषा सौंदर्य, भावना, म्हणी अशी भाषेची रूपेही अनुभवता येणार आहेत. नाटय़संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार अभिवाचन करणार आहेत. ‘आजच्या काळात नव्या पिढीची भाषा व्यामिश्र झाली आहे. सौंदर्यपूर्ण भाषेचा अभाव आहे. नव्या पिढीला भाषेचे सौंदर्य समजावण्यासाठी, नाटकाचा इतिहास, नाटकाची भाषा आणि प्रवास कळण्यासाठी हा वाचन रंग कट्टा उपक्रम सुरू करत आहोत. अभिवाचनाबरोबरच नाटय़-साहित्यविषयक चर्चाही या उपक्रमात केली जाईल. अनौपचारिक संवाद असे या कार्यक्रमाचे स्वरूप असेल. त्यात प्रत्येकाला सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यातून वाचिक, साहित्यिक देवाणघेवाण होईल. तसेच तरुण पिढीचा नाटकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनही विकसित होईल. आजच्या काळात ते फार महत्त्वाचे आहे,’असे दीप्ती भोगले यांनी उपक्रमाविषयी सांगितले. दिवाकर नाटय़छटा स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी नाटय़संस्कार कला अकादमी आयोजित दिवाकर स्मृती नाटय़छटा स्पर्धेत ९५ नाटय़छटा अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. स्पर्धेची अंतिम फेरी रविवार, २९ जुलै रोजी निवारा सभागृह, नवी पेठ येथे होणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी पुण्यातील सात केंद्रांवर झाली. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सुमारे पाचशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यात शिशु गटापासून तरुण आणि ज्येष्ठांचा समावेश होता. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अंतिम फेरीनंतर होणार आहे. यंदा या स्पर्धेचे सत्ताविसावे वर्ष आहे. ‘दिवाकर यांनी अनेक दशकांपूर्वी मराठीत आणलेला नाटय़छटा हा प्रकार दुर्लक्षितच राहिला. त्या नाटय़प्रकाराला ऊर्जितावस्था आणण्यासाठी नाटय़संस्कार कला अकादमीतर्फे या स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नाटय़छटा उपयुक्त ठरतात. वर्षांगणिक या स्पर्धेला मिळणाऱ्या प्रतिसादात वाढ होत आहे,’ असे अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी सांगितल़े chinmay.reporter@gmail.com