अन्य फळभाज्यांचे भाव स्थिर

राज्य तसेच परराज्यातून आवक वाढल्याने टोमॅटो, मटार, ढोबळी मिरची, फ्लॉवर, वांगी, हिरवी मिरची या फळभाज्यांच्या भावात घट झाली. कांद्याची आवक कमी झाल्याने भाव तेजीत आहेत. अन्य फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत.

गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात राज्य, तसेच परराज्यातून दोनशे ट्रक फळभाज्यांची आवक झाली. बंगळुरूतून चार टेम्पो आले, मध्यप्रदेश आणि पंजाब येथून नऊ ते दहा ट्रक मटार, कर्नाटक व गुजरातमधून सहा ते सात ट्रक कोबी, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूतून दहा ते अठरा टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश व तामिळनाडूतून मिळून तीन ते चार टेम्पो शेवगा, राजस्थानातून पाच ते सहा ट्रक गाजर, मध्यप्रदेश व गुजरात येथून लसूण अडीच ते तीन हजार गोणी अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती घाऊक बाजारातील प्रमुख विक्रेते विलास भुजबळ यांनी सांगितले.

राज्याच्या वेगवेगळ्या भागातून सातारी आले चौदाशे ते पंधराशे गोणी, टोमॅटो साडेपाच हजार ते सहा हजार पेटी, हिरवी मिरची तीन ते चार टेम्पो, फ्लॉवर वीस ते बावीस टेम्पो, कोबी पंधरा ते सोळा टेम्पो, ढोबळी मिरची आठ ते दहा टेम्पो, भुईमूग शेंग पंचवीस ते तीस पोती, तांबडा भोपळा आठ ते दहा टेम्पो, गवार सात ते आठ टेम्पो, भेंडी दहा ते बारा टेम्पो, कांदा चाळीस ते पंचेचाळीस ट्रक, आग्रा, इंदूर, गुजरात आणि स्थानिक भागातून बटाटा सत्तर ते पंचाहत्तर ट्रक अशी आवक बाजारात झाली.

मुळा, कोथिंबिरीच्या भावात वाढ

गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत आवक घटल्याने मुळा आणि कोथिंबिरीच्या भावात वाढ झाली आहे. अन्य पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत. रविवारी पालेभाजी विभागात कोथिंबीर पावणेदोन लाख जुडी, मेथीच्या दीड लाख जुडींची आवक झाली. पावसामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली होती. येत्या काही दिवसांत पालेभाज्यांची आवक वाढेल, त्यानंतर भाव पूर्वपदावर येतील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) पुढीलप्रमाणे-कोथिंबीर-४०० ते ७००, मेथी-५०० ते ७००, शेपू-८०० ते १०००, कांदापात-८०० ते १२००, चाकवत-५०० ते ६००, करडई-५०० ते ६००, पुदिना-४०० ते ५००, अंबाडी-६०० ते ८००, मुळा-१००० ते १२००, राजगिरा-७०० ते ८००, चुका-५०० ते ८००, चवळई-८०० ते १०००, पालक-७०० ते ८००, हरभरा गड्डी-८०० ते १०००.

फळांची आवक वाढली

ढगाळ वातावरणामुळे फळांची आवक वाढली असून फळांचे भाव स्थिर आहेत. रविवारी फळबाजारात अननस सात ट्रक, मोसंबी ऐंशी टन, संत्री पाच टन, डाळिंब सत्तर ते ऐंशी टन, पपई पंधरा ते वीस टेम्पो, लिंबे सात ते आठ हजार गोणी, चिकू दोन हजार खोकी, पेरू पंधराशे ते अठराशे पाटी, कलिंगड वीस ते पंचवीस टेम्पो, खरबूज दहा ते पंधरा टेम्पो, सफरचंद बारा ते चौदा हजार पेटी, बोरे अडीचशे ते पावणेतीनशे गोणी, द्राक्षे एक टन, स्ट्रॉबेरी पाचशे ते सहाशे किलो, सीताफळ चार ते साडेचार टन अशी आवक फळबाजारात झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.