प्रसिद्ध साहित्यिक, विज्ञानकथा लेखक रमेश सहस्रबुद्धे यांचे (वय ७८) यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सहस्रबुद्धे यांनी विविध विषयांवर ७६ पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेली विज्ञान-कुतूहल, प्राणी-पक्षी निरीक्षण, बोधकथा, वैज्ञानिकांचे आणि थोरांचे किस्से आदी विषयांवरील पुस्तके प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे ते राज्यातील पहिले मुख्य जनसंपर्क अधिकारी होते. अनेक वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरूनही त्यांची व्याख्यानमाला प्रदर्शित झाली आहे. टेलिव्हिजन आणि विज्ञानसागरातील दीपस्तंभ या त्यांच्या दोन विज्ञानविषयक पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला असून त्यातील एका पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. सहस्रबुद्धे यांच्या अन्य दोन पुस्तकांना बालकुमार साहित्य पुरस्कार मिळाला आहे. रोहा येथे १९८७ मध्ये झालेल्या विज्ञान परिषदेच्या संमेलनात त्यांच्या विज्ञानविषयक लेखन कार्याचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला होता. गोवा पाठय़पुस्तक मंडळाने आठवीच्या पुस्तकात सहस्रबुद्धे यांचा धडा समाविष्ट केला असून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कला शाखेच्या तिसऱ्या वर्षांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या एका लेखाचा समावेश करण्यात आला आहे. मराठी विज्ञान परिषदेमार्फत काढल्या जाणाऱ्या पत्रिका आणि मासिकाच्या संपादक मंडळातही त्यांनी काम केले होते. विज्ञानयुग या मासिकाच्या सल्लागार मंडळावरही ते अनेक वर्षे काम करत होते. निगडीतील ज्येष्ठ नागरिक संघाचे ते अध्यक्ष होते.