'टर्री' या आगामी चित्रपटाचे निर्माते विक्रम धाकतोडे यांना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रसिद्ध निर्माते व अभिनेता अमोल कागणे यांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अमोल कागणे यांना खोटं आमिष दाखवून त्यांची ३० लाखांची फसवणूक धाकतोडे यांनी केली आहे. चित्रपट व्यवसायात सहभागी करून घेण्याचे आमिष दाखवून त्यांनी अमोल कागणे यांना २९ लाख ५५ हजार रुपयांना गंडा घातला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अमोल कागणे यांनी पोलिसांत धाव घेत मंगळवारी (१२ जानेवारी) हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत धाकतोडे यांना पनवेल येथून ताब्यात घेतलं. "फिर्यादी अमोल लक्ष्मण कागणे हे चित्रपट निर्माते असून ते चित्रपट खरेदी विक्रीचा व्यवसायदेखील करतात. तर, आरोपी विक्रम धाकतोडे हा चित्रपट विक्रीसाठी मध्यस्थी करतो. चित्रपटाच्या अॅग्रीमेंटचा करार करतो आणि काही चित्रपट नावावरदेखील करतो असं सांगत फिर्यादीकडून वारंवार पैसे घेतले.तसंच त्यांच्यात लेखी करार झाला असून फिर्यादी अमोल यांच्याकडून चित्रपट विकत घेण्यासाठी पैसे घेऊन तेच पैसे दुसऱ्या कामाकरिता वापर केला आहे, असं फिर्यादीत म्हटले आहे. जे चित्रपट विकत घेतले आहेत ते फिर्यादी अमोल यांना न विचारता परस्पर त्यांची विक्री केली आहे. चित्रपटाच्या गुंतवणुकीसाठी दिलेल्या पैशाचा मोबदला मला न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार एप्रिल २०१९ ते २२ जून २०२० दरम्यान हिंजवडीत रोख रक्कम आणि त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने आर्थिक व्यवहार झाल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी आरोपी विक्रम धाकतोडे याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे", अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अमोल कागणे हे चित्रपट निर्माते असून 'हलाल', 'लेथ जोशी', 'वाजवू या बँड बाजा', 'परफ्यूम', 'बेफाम' या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच ते चित्रपट खरेदी विक्रीचा व्यवसायही करतात. तर आरोपी विक्रम धाकतोडे चित्रपट विक्रीसाठी मध्यस्थी करतात. दरम्यान, मराठी सिनेसृष्टीतील सध्याचा आघाडीचा डॅशिंग स्टार ललित प्रभाकर ‘टर्री’ सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. ‘ऑन युव्हर स्पॉट प्रॅाडक्शनने ‘प्रियामो एन्टरटेन्मेंट’च्या सहयोगानं ‘टर्री’ची निर्मिती केली आहे. प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील आणि विक्रम धाकतोडे या सिनेमाचे निर्माते आहेत. महेश रावसाहेब काळे यांनी आपल्या काहीशा रांगड्या शैलीत या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.