राज्यभरातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा होऊन सहा महिने झाले तरी निकाल अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र परीक्षा परिषद शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार, असा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थी आणि पालक निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. परीक्षा परिषदेतर्फे पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यंदा या परीक्षेसाठी राज्यभरातील जवळपास आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १६ फेब्रुवारीला ही परीक्षा घेण्यात आली होती. शिष्यवृत्ती परीक्षेनंतर झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर होऊनही दोन महिने होऊन गेले आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या शिष्यवृत्ती परीक्षेपेक्षा जास्त असताना, परीक्षेदरम्यानच करोना संसर्ग सुरू झालेला असताना राज्य मंडळाकडून निकाल जाहीर करण्यात आला. मात्र परीक्षा परिषदेला अद्याप निकाल जाहीर करता आलेला नाही. करोना संसर्गामुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत निकालाचे काम करता आले नाही. त्यामुळे निकाल जाहीर करता आला नाही. आता निकालाचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. ऑक्टोबरमध्ये निकाल जाहीर करण्यात येणार आहे. - तुकाराम सुपे, आयुक्त, राज्य परीक्षा परिषद