इंदापूर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने ऐन पावसाळ्यात शेती व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. उजनी धरण पाणलोट क्षेत्रालगत व नीरा नदी लगतचा भाग वगळता इंदापूरपासून शेटफळगढे व तालुक्यातील निमगावकेतकी, निमसाखर परिसरातील बारमाही पाण्याच्या प्रतीक्षेत असलेली बावीस गावे तहानेने व्याकूळ झाली असून पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. इंदापूर तालुक्यातील शेतीचे पाणी व पिण्याच्या पाण्यासाठी खडकवासला, भाटघर व नीरा डाव्या कालव्यातून लाभक्षेत्रातील सर्व तलाव भरून द्यावेत, या मागणीसाठी तालुक्यातील पळसदेव येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दशरथ माने व इंदापूर तालुका राष्टवादीच्या वतीने रास्ता रोको केले. जून महिन्यात तालुक्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडला. नंतर गेले दोन महिने पावसाने दडी मारली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना पुन्हा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले आहे. उभी पिके जळून मोठे नुकसान झाले आहे. सध्या ऐन पेरणीच्या दिवसात पाऊस नसल्याने शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. तालुक्यात डािळब बागा मोठय़ा प्रमाणात आहेत. उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी टँकरने पाणी आणून या बागा जगविल्या. परंतु पुन्हा खर्च करणे शक्य नसल्याने लाखो रुपये खर्चून लावलेल्या बागा बहरासहित जळू लागल्या आहेत. बाजारात जनावरांना ग्राहक नसल्याने जनावरे सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस पडला असला तरी इंदापूरकडे पावसाने अद्यापही पाठ फिरवली आहे.