आयपीएल सामन्यांसाठी होणाऱ्या पाण्याच्या अपव्ययाबाबत उच्च न्यायालयाने फटकारलेले असताना आणि बारामती परिसरातही तीव्र पाणीटंचाई असताना शरद पवार यांच्या बारामतीमधील स्टेडियमला पाणी देण्याचे काम शनिवारी सायंकाळीही सुरू होते. पाण्याच्या या नासाडीवर तीव्र हरकत घेण्यात आली असून ग्राहक पंचायततर्फे या संबंधीची तक्रार मा. उच्च न्यायालयाकडे केली जाणार आहे. आयपीएल सामन्यांसाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचा मुद्दा मांडून या सामन्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीत आयपीएल महत्त्वाचे की लोक, असा प्रश्न न्यायालयाने विचारला होता. ही पाणीचंगळ रोखण्यासाठी काय उपाय योजणार ते स्पष्ट करण्याचा आदेशही न्यायालयाने राज्य शासनाला दिला होता. आयपीएल आयोजकांकडून पाणीटंचाईच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार केला जाईल तसेच पुढील आयपीएल सामने महाराष्ट्रात खेळवायचे की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. राज्यातील पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर क्रिकेटच्या खेळपट्टय़ांसाठी पाण्याचा वापर टाळला जाणे गृहीत असताना प्रत्यक्षातील चित्र मात्र वेगळे आहे. बारामती येथील ज्या क्रिकेट स्टेडियमचे नुकतेच उद्घाटन झाले त्या स्टेडियमवर शनिवारी सायंकाळी पाणी मारण्याचे काम मोठय़ा प्रमाणात सुरू होते. ग्राहक पंचायत पुणे शाखेचे पदाधिकारी आणि मार्गदर्शन सेवा केंद्राचे प्रमुख विजय सागर यांनी या प्रकाराबाबत सांगितले, की राज्यात भीषण दुष्काळ आहे. शेतीला पाणी नाही, गुरांना चारा नाही, अशी परिस्थिती आहे. बारामतीशेजारी असलेल्या जेजुरीसह अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. तीन दिवसांनी पंधरा मिनिटे पाणी दिले जात आहे. अशी परिस्थिती असताना बारामतीमधील स्टेडियमच्या गवतावर पाण्याची नासाडी मोठय़ा प्रमाणावर सुरू असल्याचे शनिवारी दिसले. या प्रकाराबाबत आम्ही प्रशासनाकडे तक्रार करणार आहोत. ही बाब न्यायालयाच्याही निदर्शनास आणून देणार आहोत, असेही सागर यांनी सांगितले.