पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संबधित मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी पूजा चव्हाण यांची चुलत आजी शांताबाई राठोड यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचं वानवडी पोलिस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे. तसेच जोपर्यंत मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही. तोपर्यंत आमचं ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.

यावेळी शांताबाई राठोड म्हणाल्या, पूजा चव्हाणच्या आत्महत्येला १९ दिवसांचा कालावधी होऊन गेला आहे. तरी देखील मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जात नाही. पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करीत आहे. त्यामुळे आज आम्ही वानवडी पोलीस स्टेशनमध्ये माझा जवाब नोंदविला आहे. आता जोपर्यंत संबधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही. तसेच, संजय राठोड यांनी जरी राजीनामा दिला असेल तरी त्यांचा विरोधात गुन्हा दाखल करून शासन झाले पाहिजे अशी भूमिकाही यावेळी त्यांनी मांडली.