‘नावात काय आहे’, असं शेक्सपियर एकदा म्हणाला आणि आपण त्याचं ते वाक्य मागचेपुढचे सारे संदर्भ विसरून उगाळायला सुरुवात केली.
का म्हणाला असेल तो असं?..  काहीतरी असं घडलं असेल की ज्यामुळे त्याला नावही निरर्थक वाटू लागलं असेल..
म्हणजे, असा विचार मनात येण्याआधी, निराश वाटावं असा एखादा प्रसंग घडला असेल, ज्यामुळे आपण ‘शेक्सपियर’ असूनही आपल्या नावाला काही अर्थ नाही असं त्याला त्या क्षणी वाटून गेलं असेल.
म्हणजे बघा, कदाचित, एखाद्या बड्या हॉटेलात एखाद्या ग्रँड पार्टीसाठी त्याला रीतसर निमंत्रण पत्र वगैरे पाठवून बोलावलं असेल.
‘येताना हे निमंत्रण सोबत आणावे’ अशी तळटीप त्याच्या नजरेतून निसटली असेल आणि तो तसाच हॉटेलवर गेला असेल.
… प्रवेशद्वारावरच रखवालदारानं त्याला अडवलं असेल. मग,’आपण पार्टीसाठी आलोय, आपल्याला निमंत्रण आहे ‘, वगैरे सांगण्याचा त्याने प्रयत्न केला असेल.
पण रखवालदाराला काहीच फरक पडला नसेल.
‘ते ठीक आहे, तुमचं निमंत्रण पत्र दाखवा आणि मगच आत जा’ असं रखवालदारानं ठणकावलं असेल.
त्याला कसं समजावावं, हे शेक्सपियरला कळेनासं झालं असेल.
‘अहो, असं काय करता?… मी शेक्सपियर आहे ‘… ओळख पटवण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणून त्यानं नावाचा वापर केला असेल.
तरीही रखवालदार ढिम्म राहिला असेल.
‘तुम्ही कुणीही असा हो… आमचं कायबी म्हननं नाय. फकस्त, कार्ड दावा आन मगच आत जावा ‘… असं निर्विकारपणे म्हणत रखवालदारानं पुडीतली तंबाकू तळव्यावर घेत लांब नजर लावली असेल…
….अशा क्षणी, कदाचित,  ‘नावात काय आहे’ असा निराश विचार शेक्सपियरच्या डोक्यात आला असेल.
होतं असं कधीकधी!!

पण लगेच, असा विचार म्हणजे त्रिकालाबाधित सत्य मानायचं नसतं.
नावात खूप काही आहे.
म्हणजे, नाव ही माणसाची पहिली ओळख आहे.

आज, अचानक एखादा अनोळखी माणूस तुमच्यासमोर उभा राहिला, आणि ओळखीचं हसला, तर?…
तुम्ही गोंधळून जाल.
मग तो म्हणेल, ‘ओळखलंस मला? ‘
तुम्ही तसेच..  गोंधळलेले.
मग तो म्हणेल, ‘अरे मी गिरीश’…
तरीही तुम्ही गोंधळलेलेच.
‘अरे, गिरीश…  बापट…  मी गिरीश बापट… ‘ असं तो म्हणेल.
… आणि कुणा गिरीश बापट नावाच्या माणसाशी तुमची कधीही ओळख नसेल, तरीही तुम्हाला ओळख पटून जाईल.
आख्खं व्यक्तिमत्व तुमच्या मनासमोर तरळून जाईल!
आहे की नाही नावात सारं काही??