जातीच नाव काढेल त्याला मी ठोकून काढेन, आमच्या पाच जिल्ह्यात जात काढत नाहीत. त्यामुळे जातीयवाद आणि संप्रदायिकतेपासून मुक्त आर्थिक, सामाजिक समता-एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचे संघटन झाले पाहिजे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलमतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार लक्ष्मण जगताप, गिरीश प्रभुणे, खासदार अनिल शिरोळे, माजी खासदार प्रदीप रावत, माधव भंडारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, सोशितांची, पीडितांची निरंतर सेवा केली पाहिजे आणि ज्या दिवशी त्यांना रोटी, कपडा, मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण होईल, असा संदेश पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सामाजिक, आर्थिक आत्मचिंतनात मांडलेला आहे. त्यामुळे मी जात पात पाळत नाही, इथे किती पाळतात हे माहीत नाही. मात्र, आमच्या इथे बंद झाली आहे. कारण मी सगळ्यांना सांगितलेल आहे. जातीच नाव काढेल त्यांना ठोकून काढेन.

जातीयवाद आणि संप्रदायिकतेपासून मुक्त, आर्थिक, सामाजिक, समता, एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचे संघटन झाले पाहिजे आणि या समाजात गरीब श्रीमंत असता काम नये, कोणी छोट्या आणि मोठ्या जातीचा राहता कामा नये. एकात्म आणि अखंड असा समाज तयार झाला पाहिजे.