दापोडीच्या हरिस पुलावरून महिलेने बाळासह नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दुपारी पावणेचारच्या सुमारास या महिलेने पुलावरून नदीमध्ये उडी घेतली. यावेळी तिचा नदीत बुडून मृत्यू झाला. शहापरी असलम शेख अस मृत महिलेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडीच्या हरिस रेल्वे पुलावरून महिलेने बाळासह नदीत उडी मारली होती. मृत २२ वर्षीय महिला वाकडजवळील भुमकर चौकातील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी महिलेचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. मात्र, अजूनपर्यंत बाळाचा शोध लागलेला नाही. या महिलेच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, नदीपात्रातून महिलेचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान बाळाचा शोध घेत असताना याच ठिकाणी आणखी एक अपघात घडला. पुणे- लोणावळा लोकलमधून एक तरुण यावेळी नदीत पडला. या घटनेतील तरुणाला औंध अग्निशमन दलाच्या स्वप्नील वाघमारे, संदीप कालमकर, संजय शेवाळे आणि युवराज जाधव या टीमने वाचवले. त्यानंतर या  तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.