पुण्यातील खराडी येथील यशवंतनगर भागात राहणार्‍या एका तरुणाला एक महिला लग्न कर म्हणून समजावून सांगत होती. तो राग मनात धरून त्या तरुणाने महिलेच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. याचा पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.
रमा सदाशिव धावनपल्ली (वय ४८, रा.यशवंतनगर, खराडी) असे जखमी महिलेचे नाव आहे. तर अतुल सावळाशंकर रासकर (वय ३०, रा. यशवंतनगर खराडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सदाशिव धावनपल्ली यांचा मुलगा राकेश चा मित्र अतुल याला सदाशिव आणि त्यांची पत्नी रमा या दोघांनी तू लग्न का करत नाही? तू लग्न करून घे असे समजावून सांगितले. त्या गोष्टीचा राग मनात धरून अतुल सदाशिव यांच्या घरी गेला. तेव्हा सदाशिव यांच्या पत्नी रमा या घरी एकट्याच होत्या. अतुलने पाणी मागितले. रमा या पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात जात असताना, अतुलने त्यांच्या पाठीमागे जाऊन त्यांच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड मारली. यानंतर रमा धावनपल्ली जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. शेजारच्या लोकांनी रमा यांना जवळच्या रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अतुल याला अटक केली असून त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.