वाढदिवसाचा केक. चॉकलेट आणि अंगठीचे फोटो आणि "खर्या प्रेमाचा शेवट नसतो कारण खर प्रेम कधीच संपत नाही," अशी पोस्ट फेसबुकवर करून पुण्यात एका तरुणानं मरणाला कवटाळलं. फोटो आणि लिहिलेल्या मजकूरावरून प्रेमप्रकरणातून त्यानं आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. समीर एकनाथ भसे (वय २५) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. समीरनं एक चिठ्ठीही लिहिली होती, त्यात आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, स्व:इच्छेने जीवन संपवत असल्याचे त्यानं म्हटलं आहे. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास समीर एका दुचाकीवरून इंदोरीच्या इंद्रायणी नदीच्या पुलावर आला. तो फोनवर कुणाशी तरी बोलत होता.. त्यानंतर मात्र काही क्षणातच त्याने पुलावरून थेट इंद्रायणी नदीत उडी घेतली. शेजारी काही अंतरावर काहीजण मासे पकडत होते, त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. परंतु, तोपर्यंत समीर हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी यांची माहिती पोलिसांना दिली. आत्महत्या करण्यापूर्वी समीरनं 'खर्या प्रेमाचा शेवट नसतो कारण खर प्रेम कधीच संपत नाही..बदामाचे चिन्ह अशा आशयाचा मॅसेज फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करून समीरने आपलं जीवन संपवलं. फेसबुकवर 'ती'च्या आठवणीत समीरने चॉकलेट आणि अंगठीचा फोटो देखील पोस्ट केला होता. दरम्यान, संबंधित घटनेची माहिती अवघ्या इंदोरी गावात पसरली. समीरला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. अखेर एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. सहा तास अथक प्रयत्न करत समीरचा मृतदेह शोधण्यात त्यांना यश आले. सायंकाळी पाचच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आला. समीरने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर आत्महत्या करण्याच्या काही मिनिट अगोदर प्रेमासंबंधीची पोष्ट केलेली आहे. त्यामुळे त्याने प्रेमसबंधातून आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नाना-मम्मी मला माफ करा - आत्महत्या करण्यापूर्वी समीरनं एक चिठ्ठी लिहिली होती. "समीर एकनाथ भसे मी आत्महत्या करत आहे. यास कोणीही जबाबदार नाही. मी माझ्या मर्जीने आणि स्व:इच्छेने जीवन संपवत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. मला जीवन संपविण्यासाठी कुणीही प्रवृत्त केले नाही. मी स्वतः हा निर्णय घेतला आहे. नाना मम्मी मला माफ करा, मी तुम्हाला सोडून चाललोय," असं समीरनं चिठ्ठीत म्हटलं आहे.