राज्यातील राजकीय समीकरणे बदलून शिंदे-फडणवीस यांची सत्ता अस्तित्वात आल्यानंतर त्याचे परिणाम पुणे शहरातही दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील २० ते २२ नगरसेवकांनी भाजपाकडून उमेदवारी मिळू शकते का, याची चाचपणी सुरू केली आहे.

भाजपाच्या स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू –

राज्यातील सत्तांतरानंतर पुण्यातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना भारतीय जनता पार्टीमधील जवळपास २० नगरसेवक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये जाण्याच्या तयारीस होते. मात्र, इतर मागासवर्गीय समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे (ओबीसी) लांबलेल्या निवडणुका आणि त्यानंतर राज्याच्या राजकीय पटलावर झालेल्या घडामोडीतून झालेले सत्तांतर या सर्व घडामोडी भाजपाच्या पथ्यावर पडल्याचे तूर्तास दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून भाजपाच्या स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीमधील नगरसेवकांचा भाजपामध्ये येण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढल्यानंतर ओबीसी आरक्षण विरहीत, अन्य आरक्षणे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली. यादरम्यान जयंत बांठिया आयोगाच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्याने राज्यातील १४ महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपामधील जवळपास १० ते १५ नगरसेवकांनी महाविकास आघाडीत आणि विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची हालचाल सुरू केल्या होत्या. याच नगरसेवकांनी राजकीय फायद्याच्या हेतूने २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपामध्ये प्रवेश केला होता. हे नगरसेवक भाजपाच्या तिकीटावर निवडूनही आले. त्यानंतर या नगरसेवकांना महापालिकेत कोणतीही लाभाची पदे मिळाली नाहीत. भाजपात दाखल झालेले हे नगरसेवक तत्कालीन खासदार यांचे कट्टर समर्थक होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हेच नगरसेवक घरवापसी करणार, अशी चर्चा चालू असतानाच पुन्हा एकदा राज्यात सत्तातरांचे नाटय़ घडले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले नगरसेवक पुन्हा भाजपमध्येच राहण्याचा विचार करत आहेत. त्यातच नव्याने काही कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होण्याची चिन्हे आहेत.

भाजपाकडून योग्यवेळी भूमिका स्पष्ट करण्यात येईल –

‘महाविकास आघाडीतील बऱयाच नगरसेकांनी भाजपशी संपर्क साधलेला आहे. मात्र, याबाबत लगेच कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. भाजपाकडून योग्यवेळी भूमिका स्पष्ट करण्यात येईल,’ असे भाजपाच्या सूत्रांनी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.