पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राज्यात यंदा २३ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्याबाबत ३ ऑगस्टपासून शिक्षण विभागाच्या सूचना नसल्याने प्रवेश प्रक्रिया संपली की नाही असा संभ्रम आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा राज्यातील ९ हजार ८६ शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या १ लाख १ हजार ९०६ जागांसाठी २ लाख ८२ हजार ७८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले. त्यातील नियमित आणि प्रतीक्षा यादी मिळून १ लाख २३ हजार ९५२ विद्यार्थ्यांना सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झाला. सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी चौथ्या फेरीत ३० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. संबंधित प्रवेश ३ ऑगस्टपर्यंत चालले. राज्यात आरटीई प्रवेशाच्या नियमित फेरीमध्ये ६२ हजार ७५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले, तर प्रतीक्षा यादीतील १६ हजार १३७ असे एकूण ७८ हजार ८८९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. मात्र, त्यानंतर प्रवेश प्रक्रियेबाबत सूचनाच देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे उर्वरित जागांवरील प्रवेशांबाबत संभ्रम आहे.