पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. चारही धरणांत पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत ९४१६ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तिन्ही धरणे १०० टक्के भरली असून टेमघर धरण ९५ टक्के भरले आहे. चारही धरणांमध्ये २९ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९९.४८ टक्के पाणी जमा झाले आहे. बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ५५ मिलिमीटर, वरसगाव धरणक्षेत्रात ३४ मि.मी., पानशेत धरण परिसरात ३३ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात अवघ्या दोन मि.मी. पावसाची नोंद झाली. धरणांच्या परिसरात रात्री जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने मंगळवारी रात्री ११ वाजल्यापासून मुठा नदीत ५५६४ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. बुधवारी सकाळपासून पानशेत धरणातून विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे खडकवासला धरणातून सकाळी आठ वाजल्यापासून ९४१६ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणांच्या परिसरातील पावसाच्या प्रमाणानुसार पाण्याच्या विसर्गात वाढ किंवा कपात करण्यात येईल, असे खडकवासला धरण साखळी प्रकल्पाचे सहायक अभियंता यो.स.भंडलकर यांनी सांगितले. दरम्यान, खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तीन धरणे १०० टक्के, तर टेमघर धरण ९५ टक्के भरले आहे. लवकरच टेमघर धरणही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांतटेमघर ३.५६ ९५.९४वरसगाव १२.८२ १००पानशेत १०.६५ १००खडकवासला १.९७ १००एकूण २९ ९९.४८