पुणे : ‘आपल्या धर्मातील कुप्रथांकडे डोळेझाक करून केवळ दुसऱ्या धर्मातील दोषांवर बोट ठेवण्यात धन्यता मानणारे कडवट लोक प्रत्येक धर्मात असतात. त्याचप्रमाणे धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव मानणारे लोकही असतात. कडवट लोकांकडे दुर्लक्ष करून सर्व धर्मांबाबत बंधुभाव जपणाऱ्या लोकांना प्रोत्साहन दिले पाहिजे,’ अशी अपेक्षा हैदराबाद येथील लेखक आणि हमीद दलवाई यांच्या साहित्याचे अनुवादक ए. नागराजू यांनी रविवारी व्यक्त केली.
मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि महात्मा फुले समता प्रतिष्ठान यांच्या वतीने सत्यशोधक दिनकरराव जवळकर आणि हमीद दलवाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता परिषदेत नागराजू बोलत होते. निवृत्त पोलीस अधिकारी अशोक धिवरे यांच्या हस्ते ए. नागराजू यांचा सत्कार करण्यात आला. लेखक प्रा. नितीश नवसागरे, ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाच्या संपादक गीताली वि. म., आरोग्य सेनेचे प्रमुख डॉ. अभिजित वैद्य, प्रतिष्ठानच्या शारदा वाडेकर आणि मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी या वेळी उपस्थित होते.
गीताली वि. म. म्हणाल्या, ‘पुरुषार्थाच्या हिंसक कल्पना नष्ट करून पुरुषांमध्ये माणूसपणाच्या कल्पना रुजविल्या पाहिजेत. नातेसंबंधांमध्ये गुंतवल्यामुळे स्त्रियांना देश, समाज यांविषयी विचार करण्याची मोकळीक राहिलेली नाही. सामाजिक न्याय असेल, तर दहशतवाद नष्ट होऊ शकेल. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या निमित्ताने स्त्रियांना पुन्हा घरात ढकलले जात आहे.’
नवसागरे म्हणाले, ‘दहशतवाद ही राजकीय विचारसरणी आहे. सामाजिक, आर्थिक विचार त्यांच्यासाठी दुय्यम असतात. हिंसेचा वापर करून दहशत निर्माण करणे आणि सत्ता हस्तगत करणे, हा त्यांचा हेतू असतो. त्यामुळे दहशतवादाकडे धर्माच्या चष्म्यातून पाहता येणार नाही. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर मुळात ते दहशतवादी सीमेपलीकडून आले कसे, एवढ्या गर्दीच्या ठिकाणी पोहोचले कसे, हे प्रश्न आपण सरकारला विचारायला हवेत.’
कुराणातील अनेक आयत धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व सांगणारे आहेत. मात्र, ते जाणीवपूर्वक शिकवले जात नाही. धर्मात जबरदस्ती नको, असे कुराणात म्हटले आहे. सत्ताकारण आणि धार्मिकतेतून लोकांची सदसद्विवेकबुद्धी संपवण्याचे काम केले जात आहे.- ए. नागराजू, लेखक-अनुवादक