पाणीपुरीचे पैसे मागितल्याने तिघांनी पाणीपुरी विक्रेत्याला बेदम मारहाण करुन गाडीची तोडफोड केल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली. आरोपींनी दहशत माजवून गल्ल्यातील दीड हजारांची रोकड लुटली. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली. वैभव राजाभाऊ तरंगे (वय १९, रा. दत्तवाडी, उरूळी कांचन), तुषार अनिल अडागळे (वय १८), प्रताप बाळू लोंढे (वय २१, दोघे रा. गोळेवस्ती, उरूळी कांचन) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पाणीपुरी विक्रेता अनिल राठोड (वय ३२, रा. उरळी कांचन) याने या संदर्भात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राठोड उरळी कांचनमधील दत्तवाडी भागात पाणीपुरी विक्रीची गाडी लावतो. आरोपी वैभव, तुषार, प्रताप यांनी राठोड याच्याकडे पाणीपुरी खाल्ली. राठोडने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा आम्हाला ओळखत नाही का?, आम्ही या परिसरातील भाई आहोत, असे म्हणून आरोपींनी बांबूने राठोडला बांबूने बेदम मारहाण केली. पाणीपुरी विक्री करणाऱ्या गाडीची तोडफोड करुन दहशत माजविली. गल्ल्यातील दीड हजारांची रोकड लुटून तिघे जण पसार झाले. आरोपींनी केलेल्या मारहाणीत राठोड जखमी झाला. त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या तिघांना पोलिसांनी पकडले. पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करत आहेत.