“तृप्ती आता या जगात नाही हे अविनाशला सांगू नकोस” हे वाक्य आहे अविनाश वाघ या २२ वर्षीय तरुणाच्या आईचं म्हणजेच प्रियांका वाघ यांचं, त्या ससून रुग्णालयात कुणाच्या तरी कानात हे पुटपुटल्या. अविनाशच्या खांद्यात आणि पोटात शिरलेल्या गोळ्या काढण्यासाठी त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. शुद्धीवर आल्यावर त्याने त्याच्या पत्नीबाबत तृप्तीबाबत लगेच विचारलं तेव्हा ती धुळ्याला आईकडे गेली आहे आणि लवकरच भेटायला येणार आहे असं सांगण्यात आलं.
२६ एप्रिलच्या दिवशी काय घडलं?
पुण्यापासून साधारण ४५० किमी अंतरावर असलेल्या जळगावमधल्या चोपडा या ठिकाणी अविनाशची बहीण संस्कृतीचा हळद समारंभ होता. या कार्यक्रमात एका गाण्यावर वाघ कुटुंबीय नाचत होते. तेव्हा अचानक तृप्तीचे वडील किरण मंगळे बंदुक घेऊन कार्यक्रमात आले. त्यांनी हळद समारंभातच गोळीबार केला. ज्यामुळे तृप्तीच्या छातीत गोळी लागली तर अविनाश तिला वाचवण्यासाठी धावला असता त्याच्या खांद्यावर आणि पोटात गोळ्या लागल्या. तृप्ती जागीच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला अशी माहिती प्रियांका वाघ यांनी दिली. अविनाशची आई प्रियांका यांनी सांगितल्याप्रमाणे तृप्ती चार महिन्यांची गरोदर होती. पण तिचा मृत्यू झाल्याने २७ एप्रिलच्या दिवशी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्ताची स्थिती अशी आहे की प्रियांका वाघ या मुलाजवळ उशापायथ्याशी बसून असतात. तृप्तीच्या आईने तिला नाकारलं, वडिलांनी तर गोळीच झाडली. किरण मंगळेंच्या मनाविरुद्ध तृप्तीने लग्न केल्याने ही सगळी घटना घडली.
तृप्तीचे वडील किरण मंगळे यांनी केला गोळीबार आणि तृप्ती जागीच ठार
संस्कृतीच्या हळदीच्या कार्यक्रमात तृप्तीचे वडील किरण मंगळे आले आणि त्यांनी गोळीबार केला. ज्यानंतर काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी पोहचले. तृप्तीचे वडील केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) होते. त्यामुळे त्यांच्याकडे परवाना असलेली बंदुक होती. त्यातूनच त्यांनी गोळीबार केला. किरण मंगळे यांना तिथे लोकांनी मारहाण सुरु केली. त्यामुळे किरण मंगळेही जखमी झाले. ज्यानंतर अविनाश आणि किरण या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तृप्तीच्या वडिलांवर जळगावात उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी जितेंद्र वालटे यांनी सांगितलं की आम्ही किरण मंगळेंना तृप्तीची हत्या केल्याप्रकरणी आणि अविनाशच्या हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी ती कलमं लावून गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी आम्ही किरण मंगळेंचा मुलगा निखिल याचाही शोध आम्ही घेत आहोत. कारण तोही वडिलांबरोबर तिथे आला होता अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी या हत्या प्रकरणाबाबत काय म्हटलं आहे?
वाघ आणि मंगळे ही दोन्ही कुटुंबं अनुसुचित जातीची असल्याने जातीय किंवा धार्मिक मतभेदांमुळे हे हत्येचं प्रकरण घडलेलं नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. शिक्षणातली तफावत आणि आर्थिक स्तरात असलेला फरक यावरुन हे घडलं आहे. मंगळे कुटुंबाकडे जमीन आणि मालमत्ता आहे. तृप्तीला शिकून डॉक्टर व्हायचं होतं. तर प्रियांका वाघ यांनी मुलगा अविनाशला त्यांच्या पतीच्या निधनानंतर एकटीने सांभाळलं आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्यालयात तो स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतो. वडिलांच्या निधनानंतर आई एकटी पडल्याने १२ वीपासूनच अविनाशने काम करण्यास सुरुवात केली होती. तर तृप्तीला डॉक्टर होता यावं म्हणून तिच्या वडिलांनी म्हणजेच किरण मंगळेंनी पुण्यातल्या डी. वाय. पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटरमध्ये तिला प्रवेश घेऊन दिला होता. तृप्तीने डॉक्टर व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं.
प्रियांका वाघ यांनी अविनाशबाबत काय सांगितलं?
“माझी नणंद जळगावपासून १०० किमी अंतरावर असलेल्या शिरपूर या ठिकाणी राहते. मी तिच्याजवळ अविनाशला लहानपणी ठेवलं होतं. ती विधवा होती तिने अविनाशचं शिक्षण होईपर्यंत चांगला सांभाळ केला होता. तर तृप्ती ही माझ्या नणंदेची नात होती. अविनाश आणि तृप्ती यांची तिथेच ओळख झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. कारण तृप्ती ही सुट्टीला आजीकडे म्हणजेच माझ्या नणंदेकडे जात असे. त्यावेळी अविनाश आणि तृप्ती हे समवयस्क असल्याने सोबत खेळत असत.” असं प्रियांका वाघ यांनी सांगितलं. खरंतर सुरुवातीला त्यांच्यात भांडणंही व्हायची. पण नंतर दोघंही शांत व्हायचे. तृप्ती अविनाशला सांगायची की तू अमक्याशी मैत्री कर किंवा तमक्याशी करु नकोस. तसंच पार्टी किंवा एखाद्या कार्यक्रमात कुठे बसणार हेदेखील ती त्याला सांगत असे. असंही प्रियांका यांनी सांगितलं.

प्रियांका वाघ यांनी आणखी काय काय सांगितलं?
प्रियांका वाघ पुढे म्हणाल्या, तृप्ती आणि अविनाश यांच्या प्रेमसंबंधांबाबत समजल्यावर मी तिच्या आई वडिलांना सावध केलं होतं. तसंच मी तृप्तीलाही सांगितलं होतं की तू एका चांगल्या घरातून आलेली मुलगी आहेस, तू अविनाशशी असलेले तुझे प्रेमसंबंध संपव. तृप्तीने माझं ऐकलं नाही. ती म्हणाली मी मेले तरीही चालेल पण मी लग्न करेन तर अविनाशशीच करेन दुसऱ्या कुणाशीच नाही. प्रियांका तिच्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे तिने तिच्या घरातल्यांचंही ऐकलं नाही. तृप्ती आणि अविनाश यांच्यात तीच निर्णय घेत असे. माझा मुलगा गरीब होता त्यामुळे तो फार काही बोलू शकला नाही. आपण हे करु, ते करु, अशा पद्धतीने पुढे जाऊ हे सगळं तृप्तीच ठरवत असे. असंही प्रियांका वाघ यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.
१८ मार्च २०२४ ला अविनाश आणि तृप्तीचं लग्न
१८ मार्च २०२४ या दिवशी अविनाश आणि तृप्तीने लग्न केलं. पण मंगळे आणि वाघ कुटुंबातला तणाव कायम राहिला. लग्नानंतर हे दोघंही प्रियांका वाघ यांच्या पुण्यातील कोथरुड या ठिकाणी मागच्या वर्षभरापासून राहात होते. किरण मंगळे यांना ही बाब आवडली नव्हती. किरण मंगळे यांची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी हे सांगितलं की २०१७ मध्येच मी निवृत्त होणार होतो पण मुलीचं म्हणजेच तृप्तीचं शिक्षण व्हावं म्हणून मी नोकरीत मुदतवाढ मागून घेतली. तृप्तीसाठी आम्ही अनेक स्वप्नं पाहिली होती पण तिने आमचं काहीही ऐकलं नाही. माझ्या हातून जे घडलं त्याचा मला पश्चात्ताप आहे, पण एकीकडे माझ्या मनाला शांतता लाभली आहे असं किरण मंगळेंनी सांगितल्याचं पोलीस अधिकारी वालटे यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. किरण मंगळे यांनी मुलीसाठी सगळ्या प्रकारचा त्याग केला होता. पण तृप्तीने जो लग्नाचा निर्णय घेतला त्या निर्णयामुळे ते आतून दुखावले होते आणि आपल्याला आपल्याच मुलीने अपमानित केलं ही भावना त्यांच्या मनात बळावली ज्याचं रुपांतर प्रचंड रागात झालं, पर्यायाने आपण सूड घेतला पाहिजे याच भावनेने त्यांच्या मनात जन्म घेतला आणि त्यातूनच त्यांनी गोळ्या झाडून मुलीला आणि जावयाला संपवून टाकू असं ठरवलं.
मी तृप्तीला न्याय मिळावा म्हणून आंदोलन उभं करणार-प्रियांका वाघ
वडिलांच्या मनात काय चाललं आहे याची कल्पनाही नसलेले तृप्ती आणि अविनाश त्यांच्या वैवाहिक आयुष्यत खुश होते. तृप्ती जेव्हापासून गरोदर राहिली तेव्हापासून तर या दोघांना आभाळ ठेंगणं झालं होतं. दरम्यान तृप्तीचा हा निर्णय तिच्या घरातल्यांना मुळीच आवडला नव्हता. एकदा ते आमच्या घरी आले आणि तृप्तीला त्यांच्यासह धुळ्याला घेऊन गेले. तिथे त्यांनी तृप्तीला मारहाण केली आणि तू गर्भपात कर असंही तिला सांगितलं. नोव्हेंबर २०२४ मध्ये ती घरी आली, जे घडलं त्याचा तिला धक्का बसला होता. त्यामुळे ती माझ्याकडे रडायची अशी माहिती प्रियांका वाघ यांनी दिली. दरम्यान संस्कृतीचं लग्न ठरलं आणि या दोघांना थोडं आनंदी व्हायची संधी मिळाली. माझ्यासाठी आणि तृप्तीसाठी तिच्या घरातल्यांनी पैठणी साड्याही खरेदी केल्या होत्या. तर हळद समारंभासाठी संस्कृतीने अविनाशला कुर्ता पायजमाही घेतला होता. तृप्तीने तर माझ्या उजव्या हातावर मेहंदीही काढली होती, असंही प्रियांका यांनी सांगितलं. २४ एप्रिलच्या दिवशी आम्ही सगळे आनंदात होतो. पण पुढच्या दोन दिवसांत काय होणार आहे ते आम्हाला माहीत नव्हतं. तो दिवस उजाडला आणि खूप वाईट आठवणी देऊन संपला. तृप्तीला काळ आपल्यासह घेऊन गेला असंही प्रियांका वाघ यांनी सांगितलं. आता अविनाशला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला की मी आंदोलन करण्यासाठी बसणार आहे. काहीही करावं लागलं तरीही चालेल पण मला तृप्तीला न्याय मिळवून द्यायचा आहे. किरण मंगळेंनी जो हल्ला केला त्याला ज्यांनी चिथावणी दिली असेल त्यांनाही मी दोषीच मानते. त्यांना प्रत्येकाला याचं उत्तर द्यावं लागेल. मी तृप्तीला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणार आहे. प्रत्येकाने प्रेमाचा आदर केला पाहिजे आपण जर असं केलं नाही तर जगायचं कसं? असाही प्रश्न प्रियांका वाघ यांनी विचारला आहे.