पुणे : संपादक आणि प्रकाशकांच्या आग्रहाखातर मी लेखन केले. साहित्यिकाला आवश्यक बैठक माझ्याकडे नाही. मी पूर्णवेळ कलाकार आणि अर्धवेळ लेखक आहे, असे मत दिलीप प्रभावळकर यांनी बुधवारी व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीच्या वतीने प्रभावळकर यांच्या 'मी असा (कसा) झालो', 'अनपेक्षित' आणि 'माझ्या धम्माल गोष्टी' या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने रानडे यांनी प्रभावळकर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी प्रभावळकर बोलत होते. अक्षरधाराच्या मान्सून सेलचे उदघाटन प्रभावळकर यांच्या हस्ते झाले. प्रभावळकर म्हणाले, एकच षटकार पाक्षिकासाठी क्रिकेटवरचे 'गुगली' हे सदर त्यावेळी लोकप्रिय झाले होते. 'लोकसत्ता'च्या सुवर्णमहोत्सवी वर्षात संपादकांच्या आग्रहास्तव टिपरे कुटुंबाची रोजनिशी या स्वरूपात 'अनुदिनी' हे सदर वर्षभर लिहिले होते. त्यावर केदार शिंदे यांनीं मालिकेची निर्मिती केली. मला स्तंभलेखन सुरू केले. टिपरे कुटुंबाच्या रोजनिशीवर अनुदिनी ही मालिका झाली. लेखन करताना नेहमीचा मी, लेखक म्हणून माझी भूमिका आणि वाचणारे कोण अशी तिहेरी भूमिका असते. वाचकाचा विचार पूर्णपणे विसरू शकत नाही. पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर आणि जयवंत दळवी या तीन लेखकांचा माझ्यावर प्रभाव आहे. या तिघांच्या नाटकांतून भूमिका करण्याचे भाग्य मला लाभले, असे प्रभावळकर यांनी सांगितले. रसिका राठिवडेकर यांनी प्रास्ताविक केले. राजहंस प्रकाशनचे शिरीष सहस्रबुद्धे यांनी मनोगत व्यक्त केले. अक्षय वाटवे यांनी सूत्रसंचालन केले.