बारामती : महावितरणने महाराष्ट्र राज्य विद्युत नियमक मंडळाकडे जवळपास ३७ टक्के वीज दरवाढ करण्यासाठी परवानगी मागितली आहे. मुळातच महाराष्ट्राचे वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असून, पुन्हा दरवाढ लादल्यास महाराष्ट्रातील उद्योग प्रचंड आर्थिक अडचणीत येतील. शासनाने संभाव्य वीजदरवाढ त्वरित मागे न घेतल्यास महाराष्ट्रातील उद्योजक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिला. महावितरणच्या दरवाढीच्या प्रस्तावाची होळी करून बारामतीतील उद्योजकांनी ऊर्जा भवन येथे निषेध व्यक्त केला. त्याप्रसंगी जामदार बोलत होते. असोसिएशनचे सचिव अनंत अवचट, संभाजी माने, अंबीरशाह शेख, महादेव गायकवाड, हरीश कुंभरकर, मनोहर गावडे, चंद्रकांत नलवडे, संदीप जगताप, हरीश खाडे, नितीन जामदार, राजन नायर, जीटीएन कंपनीचे उद्धव मिश्रा, संतोष कणसे, विजय झांबरे, रघुनाथ दाभाडे, अमोल रणशिंग या वेळी उपस्थित होते. हेही वाचा - ‘आप’चे पिंपरी-चिंचवडचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांचे निलंबन रद्द हेही वाचा - पोलिसांच्या घरात चोरट्यांच्या डल्ला; विश्रांतवाडी पोलीस वसाहतीत घरफाेड्या जामदार म्हणाले, राज्याराज्यातील उद्योगांमधील तीव्र स्पर्धा असताना महाराष्ट्रातील वीज दर कळीचा मुद्दा ठरत आहे. अशातच पुन्हा वीज दरवाढ केली तर महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायिक स्पर्धेतून बाहेर फेकले जातील याची चिंता वाटत आहे. बारामतीसह राज्यातील मोठे प्रकल्प अवाजवी वीज दरामुळे बंद पडण्याच्या मार्गावर असून, लहान मोठे उद्योग परराज्यात स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत. वीज दरवाढीविरोधात उद्योजकांचे निवेदन राज्य सरकार आणि महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता गणेश लटपटे यांनी असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले.