सैन्य दलातील भरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला विरोध, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईच्या निषेधार्थ पश्चिम महाराष्ट्र युवक काँग्रेसने आज (शनिवार) भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनामुळे काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगीही होऊन तणाव निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, सरचिटणीस प्रथमेश आबनावे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष राहुल शिरसाठ यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस स्नेहल डोके, अनिकेत नवले, जयदीप शिंदे, अक्षय जैन, चिटणीस अनिकेत अरगडे, सातारा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, पुणे शहर उपाध्यक्ष सौरभ अमराळे, अक्षय माने, धनराज माने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. अखेर आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी खेळ केला जात आहे - “मोदी सरकार ईडीसह इतर तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. या यंत्रणांना पुढे करून विरोधी पक्षांना त्रास दिला जात आहे. हे लोकशाहीला अतिशय घातक आहे. अग्निपथ सारख्या योजनेतून देशातील युवकांच्या भवितव्याशी आणि देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी खेळ केला जात आहे. लष्करात जाण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या लाखो मुलांना कंत्राटीकरणाच्या खाईत ढकलणारी अग्निपथ योजना रद्द करावी.” असे शिवराज मोरे यांनी सांगितले. वाज दडपण्यासाठी ईडीची कारवाई - तर, “राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठवत असल्याने त्यांचा आवाज दडपण्यासाठी ईडीची कारवाई सूडबुद्धीने करत आहे.” असे राहुल शिरसाठ म्हणाले. प्रथमेश आबनावे यांनी मोदी सरकारचा निषेध करत तरुणांचे आणि देशाचे मोठे नुकसान करणारी अग्निपथ योजना रद्द करण्याची मागणी केली.