शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या १६ आमदारांच्या अपात्रेबाबत सर्वोच्च न्यायालयात १४ फेब्रुवारीपासून सुनावणी होणार आहे. “सर्वोच्च न्यायालयाने १४ किंवा १५ तारखेला निकाल देत महाराष्ट्रातील विधानसभा बरखास्त केली; अथवा हे सरकार चुकीचं आहे, असा निर्णय दिला. तर, राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही”, असा दावा विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला होता. याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर आपल्या नेहमीच्या शैलीत सडेतोडपणे उत्तर देत असताना अजित पवार म्हणाले, “तुम्हाला आम्हाला दुसरे उद्योग नाहीत का? उठसूठ निवडणुकीला सामोरे जायला”. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना अजित पवार यांनी या विषयावर आपले परखड मत मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाचा >> अजित पवारांनी एका वाक्यात वरळीच्या सभेची उडवली खिल्ली, म्हणाले, “वरळीमध्ये जंगी, भव्य…”

आमदार अपात्र ठरले तरी इतरांना सत्ता स्थापनेची संधी आहे

उद्या जरी कुणी अपात्र ठरले आणि इतर कुणी सत्तास्थापनेचा दावा केला, तर राज्यपालांना संधी द्यावीच लागेल. ज्यावेळी त्रिशंकू परिस्थिती असते तेव्हा राष्ट्रपती शासनाची परिस्थिती उद्भवते. तुम्हाला आम्हाला दुसरे उद्योग नाहीत का? उठसूठ निवडणुकीला सामोरे जायला. असीम सरोदे विधिज्ञ आहेत, वकिलीचा त्यांचा अभ्यास केला आहे, त्यामुळे आक्षेपार्ह विधान करायचे नाही. पण मला वाटत नाही, ते म्हणाले तसं काही होणार नाही. तसेच जर तरच्या विधानांना अजित पवार उत्तर देत नसतो, असे ठामपणे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले होते असीम सरोदे?

“भारतीय संविधानातील कलम १७२ नुसार विधानसभेचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो. राज्यात २०१९ साली १४ वी विधानसभा अस्तित्वात आली. पण, शिवसेनेत फूट होऊन नवीन सरकार स्थापन झालं. त्याप्रकरणाचे कायदेशीर आणि घटनात्मक पेचप्रसंग आहेत, ते सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आले. यावर १४, १५ आणि १६ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत निकाल येऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने १४ किंवा १५ तारखेला निकाल देत महाराष्ट्रातील विधानसभा बरखास्त केली; अथवा हे सरकार चुकीचं आहे, असा निर्णय दिला. तर, राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही. अशावेळी कलम १७२ नुसार विधानसभा टिकत नाही. त्यामुळे विधानसभा विसर्जित झाल्याने निवडणुकांचं आयोजन होऊ शकत नाही. त्यासाठी मतदानही केलं जाऊ शकत नाही,” असं असीम सरोदेंनी सांगितलं होतं.

फालतू प्रश्न विचारले तर पुन्हा उत्तर देणार नाही?

चिंचवड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी करुन अपक्ष अर्ज सादर केला आहे. राहुल कलाटेशी याबाबत आपण बोलणार आहोत, त्याला कुणाची फुस आहे का? असे विचारणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. मात्र राहुल तुमचे ऐकणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर अजित पवार चांगलेच संतापले. “मी पत्रकारांचा आदर करतो. पण असले आलतूफालतू प्रश्न विचारणार असाल तर पुन्हा मी माध्यमांशी बोलणार नाही. मी काय साधासुधा कार्यकर्ता नाही. राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. उद्या कुणीही ऐरागबाळा काहीही बोलेल, त्यावर तुम्ही जर मला प्रश्न विचारणार असाल तर त्याला काही अर्थ नाही”, अशी तंबीच अजित पवार यांनी पत्रकारांना दिली.

प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

प्रज्ञा सातव यांच्या हल्ल्याची बातमी आज सकाळी माध्यमात वाचायला मिळाली. राजीव सातव यांनी तरुण वयात चांगले काम केले होते. राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी म्हणून ते परिचित होते. अतिशय कमी कालावधीत ते आपल्याला सोडून गेले. राजीव सातव यांच्या आई देखील आमदार होत्या, त्यांच्या सोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. प्रज्ञा सातव यांच्यावर अचानक जबाबदारी पडल्यानंतर त्यांनी ती समर्थपणे सांभाळली आहे. राजीव सातव यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर अशाप्रकारे भ्याड हल्ला केला असेल, तर त्याचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

या घटनेचा मास्टरमाईंड शोधून काढा

तसेच दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्यावर दगडफेक झाली, अशी बातमी कानावर आली होती. प्रत्येकाचे सरंक्षण करणे ही राज्य सरकारची जबाबदारी असते. लोकप्रतिनिधी तर लाखो लोकांचे प्रतिनिधीत्व करत असतो. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब या प्रकरणात लक्ष घातले पाहीजे. या घटनेच्या मागे मास्टर माईंड कोण आहे? हे शोधून काढत त्याला कडक शासन केले पाहीजे. अशाप्रकारचे हल्ले कुणावरच होता कामा नये. लोकशाहीत विरोधकांनाही तेवढेच महत्त्वाचे स्थान असते. विरोधकांना सुरक्षित वाटले पाहीजे, असेही त्यांनी म्हटले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar reply to asim sarode statement about kasba peth and chinchwad by election dropped after supreme court verdict kvg
First published on: 09-02-2023 at 12:43 IST