पुण्यातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 30 जुलै रोजी पार पडले. सकाळी 7 वाजताच हा कार्यक्रम पार पडला. या उद्घाटन कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पुणे मेट्रोचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजपाने केला होता. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

अजित पवार म्हणाले की, प्रत्येक जण आपआपलं काम करीत असतो. त्यामुळे भडकायचा काय कारण आहे. ती केवळ ट्रायल होती. त्यावरून देखील भडकायचं, ती काही रेग्युलर नव्हती. ती एकदा सुरुवात करायची होती. त्या निमित्ताने कार्यक्रम झाला. तर त्याला प्रसिद्धी मिळते आणि नागरिकांना कळते, इथे पर्यंत काम झालेले आहे. त्या दिवशी ते स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सवर आलेच होते ना, शहराचे प्रथम नागरिक होते. काही इतर आमदार होते. त्याच्यामध्ये साधेपणाने आणि मर्यादित, लोकांच्यामध्ये कार्यक्रम घ्यायचा होता. म्हणून सकाळी सात वाजता कार्यक्रम घेतला.

भाजपचे आंदोलन आणि व्यापाराच्या दबावा पुढे नियम शिथीलतेचा आपणास निर्णय घ्यावा लागला का त्यावर अजित पवार म्हणाले की, मी कोणाच्याही दबावाला घाबरत नाही. ३.३ टक्केच्या आत पुणे आले आणि आज तर २.८ इतके आहे. तर ३.३ टक्केच्या आतमध्ये आल्याने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा कोणाच्याही दबावाला घाबरून राज्य चालविता येत नसतं, शेवटी राज्यातील जनतेचं आरोग्य देखील महत्वाच असतं, आता काहींना मागणी करताना, लोकप्रिय वाटतील. पण उद्या तिसरी लाट जबरदस्त आली. सरकारला कळलं नाही, सरकार काय करत होतं, त्यांना कोणी आडवल होते. ढोलकी कशी वाजते दोन्ही बाजूने, तसला प्रकार आहे. फार विचार करून निर्णय घेतला जात असतात.

महिला पोलीस अधिकार्‍यांनी मोफत बिर्याणीची मागणी केली. त्यावर चर्चा सुरू आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, यावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी भूमिका मांडली आहे. घडलेली बाब चुकीची असून त्याच मी कधीच समर्थन करणार नाही. त्या विभागाच्या प्रमुखांनी एकदा सांगितल्यावर, माझ्या सारख्याने त्यावर उत्तर देणे काही गरज वाटत नाही. तसेच घडलेला प्रकार ठीक नव्हता.