राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रामीण भागामध्ये करोना रुग्ण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केलीय. मात्र त्याचवेळी त्यांनी असं असतानाही सणवार साजरा करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या विरोधकांनाही खास आपल्या शैलीत खडे बोल सुनावले आहेत. आज पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या परिषध अध्यक्ष पदाचा पदभार विद्याधर अनास्कर यांनी स्वीकारला त्यावेळी अजित पवार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी सहकार क्षेत्रापासून वाढत्या करोना रुग्णसंख्येसंदर्भात अनेक गोष्टींबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केलं.

ग्रामीण भागामध्ये वाढणाऱ्या करोना रुग्णसंख्येसंदर्भात बोलताना अजित पवारांनी केंद्र सरकारचा दाखला दिला. “रुग्णसंख्येच्या बाबतीत केरळ पहिल्या क्रमांकावर आणि महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर असल्याने काळजी घ्यावी, असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. मात्र दुर्देवाने आपल्या राज्याच्या ग्रामीण भागामध्ये राहणार्‍या नागरिकांमध्ये करोना आजाराची भीतीच राहिलेली नाही. कुठे ही नियम पाळले जात नाही. आता सर्व संपले आहे असा काही लोकांमध्ये गोड गैरसमज झाला आहे. त्यामुळे तिथे रुग्णसंख्या वाढायला लागलेली आहे. म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी आव्हान करत असतात. मात्र त्यातून काही जण राजकारण करतात. त्यातून काही जण सण साजरे करण्याचा प्रयत्न करतात. हे जे काही आहे ते कुठं तरी थांबल पाहिजे. पुन्हा तिसरी लाट आल्यावर येरे माझ्या मागल्या करून सगळंच बंद करण्याची वेळ राज्यावर आणू नये एवढच विनंती आहे.” असं अजित पवार म्हणाले.

आणखी वाचा- “…मला काही तेवढाच उद्योग नाही”; अन् अजित पवार संतापले

“सहकारमुळे राज्यात बदल आणि विकास देखील झाला आहे.पण याच सहकाराला नाव देखील ठेवण्याचे काम केले गेले आहे. काही जणांनी चुकीचे काम केले असेल तर संपूर्ण सहकार क्षेत्रात चुकीचे आहे, असं होत नाही,” असं मत सहकार क्षेत्रासंदर्भात बोलताना अजित पवारांनी व्यक्त केलं.

आणखी वाचा- पुण्यात नव्यानं निर्बंध लादणार?, अजित पवार म्हणाले…

राज्यातील शाळा प्रश्नावरही अजित पवारांनी भाष्य केलं. “शाळा सुरू करण्या बाबत सध्या दोन मतप्रवाह पाहण्यास मिळत आहे. त्यामध्ये काही जण म्हणतात दिवाळीनंतर, तर दुसर्‍या बाजूला काही जण म्हणतात जिथे शून्य टक्के रुग्ण संख्या आहे.तिथे शाळा सुरू करण्यात याव्यात. तसेच राज्यातील शाळा केव्हा सुरू करायच्या. या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेतील,” असं अजित पवार म्हणाले.

१२ आमदारांनी नियुक्ती आणि राजू शेट्टी यांच्या प्रश्नावर अजित पवार यांनी, “राज्यपालांना आम्ही मागील आठवड्यात भेटणार होतो. मात्र काही कामानिमित्त राज्यपाल दिल्ली येथे गेले होते. काल आम्ही राज्यपालांची भेट घेतली. राज्यातील परिस्थितीबाबत त्यांना आम्ही माहिती दिली आणि योग्य तो निर्णय घेतो असे त्यावर त्यांनी सांगितलं,” असं उत्तर दिलं.