पुणे : ‘नमस्कार, सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे,’ हा आवाज सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित व्हायचा, तेव्हा आदल्या दिवशीच्या आणि सकाळच्या ताज्या घडामोडींचा साद्यंत वृत्तांत देणाऱ्या बातम्या ऐकण्यासाठी घरातील सर्वजण हातातील कामे बाजूला ठेवून रेडिओसमोर असायचे… पन्नास वर्षांनंतर अगदी असे चित्र नसले, तरी वृत्तविभाग जास्तीत जास्त ताज्या बातम्या सांगण्यासाठी झटत आहे आणि त्या ‘सांगण्या’तील आपलेपणा टिकून असल्याने पुणे केंद्राच्या बातम्यांचा श्रोतृवर्गही अजून टिकून आहे…

पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या या प्रादेशिक बातमीपत्राची उद्या, महाराष्ट्र दिनी (१ मे) सुवर्णमहोत्सवपूर्ती होत आहे. चोवीस तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि समाज माध्यमे सक्रिय असतानाही आकाशवाणीच्या प्रादेशिक बातम्यांवरचे प्रेम अजूनही अबाधित आहे.

‘महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे १९७५ रोजी आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्यांचा श्रीगणेशा झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या संदेशाने बातमीपत्राची सुरुवात झाली होती. पहिले बातमीपत्र वाचन करण्याचा मान सदाशिव दीक्षित यांना लाभला होता. या प्रादेशिक बातम्या राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित केल्या जात असल्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर बृहन्महाराष्ट्रामध्ये जेथे मराठी माणसांचे वास्तव्य आहे, त्या सर्व ठिकाणी या बातम्या ऐकायल्या जायच्या. त्या काळात पुरेशा पायाभूत सुविधांसह संदर्भांचा अभाव असताना पुण्यातील पत्रकारांनी या बातमीपत्राला बहुमोल मदत केली. त्यामुळे या बातम्यांना लोकप्रियता लाभली,’ अशी माहिती ५० वर्षांपूर्वी वृत्तसंपादक असलेले चंद्रशेखर कारखानीस यांनी दिली. ‘सुधा नरवणे आणि कमलाकर पाठकजी हे वृत्त विभागातील माझे सहकारी होते,’ असेही त्यांनी सांगितले.

‘राज्यातील आकाशवाणीच्या चारही केंद्रांमध्ये पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्यांना अजूनही श्रोतृवृंद आहे. मला केंद्रावर साडेसहा वर्षे वृत्तसंपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात भालचंद्र जोशी यांचा आवाज घरोघरी पोहोचलेला होता. लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त ४ जानेवारी २०१६ रोजी पुणे ब्लाइंड मेन्स असोसिएशन या संस्थेच्या सहकार्याने धनराज पाटील या दृष्टिहीन व्यक्तीकडून बातम्या वाचण्याचा अभिनव प्रयोग केला होता. या प्रयोगाची वाखाणणी झाली होती. इतकेच नव्हे, तर आकाशवाणी पुणे केंद्राच्या वृत्तविभागाला सर्वोत्तम वृत्तविभागाचा पुरस्कार मिळाला होता,’ अशी आठवण माजी वृत्तसंपादक नितीन केळकर यांनी सांगितली.

वृत्तविभाग बंद करण्याचे प्रयत्न असफल

मधल्या काळात आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि वृत्तविभाग बंद करण्याच्या हालचाली झाल्या होत्या. मात्र, पुणेकरांच्या रेट्यामुळे हा निर्णय स्थगित करावा लागला. आतादेखील २०१६ पासून वृत्तसंपादक हे पद रिक्त आहे. सध्या मनोज क्षीरसागर आणि माधवी कुलकर्णी हे वृत्तविभागाचे काम पाहत आहेत.

प्रादेशिक बातम्यांचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम गेल्या वर्षी साजरा केला होता. त्यामुळे या वेळी सुवर्णमहोत्सवपूर्तीनिमित्त वेगळा कार्यक्रम करण्याचे नियोजन नाही. – माधव जायभाये, केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे केंद्र