घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनामुळे संत नामदेवांनी पंजाबमध्ये ७०० वर्षांपूर्वी केलेल्या कार्याची उजळणी होणार आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
३ ते ५ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या संमेलनाच्या निमित्ताने अण्णांनी पहिल्यांदाच घुमानला भेट दिली. संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अण्णांच्या हस्ते करण्यात आले. सरहदचे संजय नहार, दत्ता आवारी, विनायकराव पाटील आणि बलभीम जगताप या वेळी उपस्थित होते.
अण्णा हजारे म्हणाले, ७०० वर्षांपूर्वी नामदेवांनी भागवतधर्माची पताका घेऊन पंजाबमध्ये जागृती केली. त्यांच्या कार्यासमोर बादशाहाला नतमस्तक व्हावे लागले. संत नामदेवांचा तोच संदेश घेऊन मी येथे आलो आहे. सर्वसामान्य माणूस आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांविरोधात मी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन. आज पहिल्यांदाच घुमानला आलो आहे. हे स्थान स्फूर्तिदायक आणि प्रेरणादायी आहे. साहित्यसंमेलनामुळे पंजाब आणि महाराष्ट्रातील संबंध दृढ होण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यासाठी निश्चितच मदत होईल.
अण्णांनी तपियाना गुरुद्वारासाहिब आणि संत नामदेव गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले. घुमान पंचायत समिती आणि श्री नामदेव दरबार कमिटीतर्फे अण्णांचा सत्कार करण्यात आला.