मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे साहित्यसंमेलनाच्या ठिकाणी आगमन होत असताना बेळगाव येथील सीमावासी नागरिकांनी त्यांच्यासमोर घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या मागण्यांचा संदर्भ देऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सीमावासीय नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, आम्ही व्यासपीठावरील सर्व मायमराठीचे सेवक आहोत. जोपर्यंत तेथे मराठीवर अत्याचार होतोय, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. सरकार व समाज आपल्या पाठीशी राहील आणि शेवटचा मराठी माणूस तेथे असेपर्यंत लढा सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
‘देहू-आळंदी पिंपरी पालिकेत घ्या’
देहूचे सुपुत्र व संत तुकाराममहाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी साहित्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना श्रीक्षेत्र देहू आणि आळंदीचा िपपरी पालिकेत समावेश करावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत ते म्हणाले, की देहू आणि आळंदी ही दोन्ही ठिकाणे िपपरी-चिंचवडच्या हद्दीबाहेर आहेत, त्यामुळे एकीकडे विकासाची गंगा आहे तर दुसऱ्या बाजूला सातत्याने काहीतरी मागत राहावे लागते. जर या गावांचा िपपरी पालिकेत समावेश झाला तर दोन्हीकडे विकासाची चांगली कामे करता येतील. आमची स्वायत्तता नष्ट होईल, अशी भीती दोन्हीकडील गावकऱ्यांना वाटते. कदाचित ती निर्थक नसेलही. मात्र, काही प्रमाणात स्वायत्तता कायम ठेवून या गावांचे िपपरीत विलीनीकरण करावे, वेळप्रसंगी कायद्यात दुरुस्ती करावी.
पिंपरी पालिकेचे ‘मार्केटिंग’
मराठी साहित्यसंमेलनाचा उद्घाटन सोहळा सुरू असताना िपपरी पालिकेच्या विकासकामांवर आधारित लघुपट उपस्थितांना दाखवण्यात आला. गेल्या काही वर्षांतील शहराची प्रगती, मोठे रस्ते, भव्य उड्डाणपूल, उद्याने, विविध प्रकल्प आदींची माहिती त्यात होती. निवेदक राहुल सोलापूरकर यांच्या निवेदनाच्या माध्यमातून शहराचा इतिहास त्यात मांडण्यात आला. शहराविषयीची अद्ययावत माहिती या लघुपटातून उपस्थितांना मिळाली. त्यामुळे अचूक टायमिंग साधून िपपरी महापालिकेने मार्केटिंग केल्याचे दिसून आले. साहित्यसंमेलनासाठी िपपरी महापालिकेने भरपूर सहकार्य केले आहे. त्यामुळे संमेलनात मोक्याच्या वेळी हे सादरीकरण करण्यास आयोजक संस्थेने हिरवा कंदील दाखवला.