तुटवडा टाळण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन पुणे : राज्यातील रक्तपेढ्यांकडे सध्या के वळ ३५ हजार युनिट म्हणजे सरासरी १० दिवसांसाठी पुरेसा रक्तसाठा असून रक्ताच्या तुटवड्याचे संकट टाळण्यासाठी रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन राज्य रक्तसंक्रमण परिषदेकडून करण्यात आले आहे. राज्यातील रक्तपेढ्यांकडे दररोज किमान २० ते २५ दिवस पुरेल एवढा रक्ताचा साठा असणे सुरक्षित मानले जाते. सध्या हा साठा के वळ १० दिवसांचा असल्याने रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. राज्य रक्तसंक्रमण परिषदेचे सहायक संचालक डॉ. अरुण थोरात म्हणाले, महाविद्यालये, आयटी कं पन्या, कॉर्पोरेट उद्योग अशा ठिकाणी विविध निमित्तांनी होणारी रक्तदान शिबिरे हे रक्तसंकलनाचे महत्त्वाचे स्रोत असतात. सध्या यांपैकी बहुतांश ठिकाणे बंद आहेत. त्याचा परिणाम रक्तसंकलनावर होत आहे. संकलन के लेल्या रक्ताची साठवणूक आणि वापर ३५ दिवसांपर्यंत करणे शक्य होते. सध्या रोज केवळ १० दिवस पुरेल एवढा रक्तसाठा असल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. रक्तसंकलन शिबिरात संकलित होणारे रक्त सहा तासांच्या चाचण्यांनंतर वापरात आणले जाते. केवळ तुटवडा सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर रक्तदानासाठी पुढे येण्याचे धोरण न ठेवता प्रत्येक निरोगी नागरिकाने दर तीन महिन्यांनी रक्तदान करण्याची सवय लावून घेतल्यास राज्यातील रक्तसाठा सुरळीत ठेवणे शक्य होते. करोनाची भीती बाळगून रक्तदानासाठी पुढे येणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे, मात्र इतर व्यवहार सुरळीत करताना रक्तदानालाही प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले. स्थिती काय? ’राज्यात दररोज सुमारे तीन ते पाच हजार युनिट रक्तसाठा वापरला जातो आणि तेवढ्याच रक्ताचे संकलनही होते. सद्य:स्थितीत राज्यातील रक्तपेढ्यांकडे ३५ हजार युनिट रक्ताचा साठा आहे. ’ राज्यात १० दिवस पुरेल एवढा रक्तसाठा दररोज उपलब्ध ठेवला जातो. मात्र, हा साठा दररोज किमान २० ते २५ दिवसांना पुरेल एवढा असणे अपेक्षित आहे. ’राज्यातील सर्व रक्तपेढ्यांनी छोट्या रक्तसंकलन शिबिरांचे आयोजन करून आवश्यक रक्तसाठा कायम राखावा, असे आवाहन राज्य रक्तसंक्रमण परिषदेकडून करण्यात आले आहे. रक्तदानामुळे. शरीराचे बोन मॅरो स्टिम्युलेशन सुधारते. शरीरात नव्या रक्ताची निर्मिती होते. दुर्धर आजारांची शक्यता कमी होते. अतिरिक्त लोह आणि कोलेस्ट्रॉल कमी होते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.