लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पवित्र संकेतस्थळामार्फत राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी २४ मे ते ६ जून या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी २६ एप्रिल ते १० मे या कालावधीत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयबीपीएस या संस्थेच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ही परीक्षा उमेदवारांना मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातून देता येणार आहे. दोनशे गुणांच्या या परीक्षेत १२० गुण अभियोग्यता, तर ८० गुण बुद्धिमत्तेसाठी असतील. अभियोग्यता विषयात गणितीय क्षमता, भाषिक क्षमता अशा घटकांचा, बुद्धिमत्ता विषयात समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क-अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश असेल. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. या परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांतील भरतीसाठी ग्राह्य धरले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात नावाची नोंद करताना ती आधार कार्डमधील नोंदीप्रमाणे असणे आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी, निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दाखवणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्जातील नावात आणि आधारकार्डवरील नावाच्या नोंदीत कोणतीही तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. अर्ज सादर करताना उमेदवाराने तीन परीक्षा केंद्रांची निवड करणे अनिवार्य आहे. अधिक माहिती http://www.mscepune.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोटी माहिती दिल्यास कारवाई

२०१८ आणि २०१९मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेली आहे. उमेदवारांनी त्या यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती अर्जात भरावी. भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही टप्प्यावर संपादणूक रद्द करण्यात येईल. तसेच खोटी माहिती भरून परीक्षा दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.