पुणे : गळा आवळून मित्राला ठार मारल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघडकीस आले आहे. दोन महिन्यांनी खुनाला वाचा फुटली असून, याप्रकरणी तीन जणांना चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना १४ आणि १५ मार्चदरम्यान चंदननगरमधील पठारे वस्तीवरील एका हॉटेलमध्ये घडली होती.

आकाश सुनील साबळे (वय ३० रा. नागपाल रोड, चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. शशिकांत मच्छिंद्र घोरपडे (वय ३४, रा. खुळेवाडी), रोहित आनंद मोरे (वय २३, रा. ताउजीनगर, वडगाव शेरी ) आणि यश रघुनाथ डांगे (वय २१, रा. शुभंकर पार्क, केसनंद, थेऊर रस्ता, कोलवडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश साबळे आणि आरोपी १४ व १५ मार्चला चंदननगरमधील हॉटेलमध्ये दारू पित बसले होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती. त्याच रागातून टोळक्याने आकाशचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. चौकशी अहवालासह शवविच्छेदन अहवालातून आकाशचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यादिवशी सोबत असलेल्या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तपासाला गती देत तिघांना अटक केली. पोलीस निरीक्षक स्वाती खेडेकर पुढील तपास करीत आहेत.