‘गुटख्यावर घातलेली बंदी सार्वजनिक हितासाठी गरजेची असून, मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही गुटख्यावरील बंदी कायम आहे,’ असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
गुटखा बंदीमुळे गुटखा विक्रेत्यांचे रोजगाराचे साधन बंद झाले असल्यामुळे ही बंदी उठवावी, अशी मागणी विक्रेत्यांकडून होत आहे. पण विक्रेत्यांपेक्षा गुटखा किंवा तंबाखू सेवन करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. ‘वैयक्तिक हितापेक्षा सार्वजनिक हिताक डे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे ही बंदी गरजेची आहे’, असे झगडे म्हणाले. ‘विकली जाणारी तंबाखू प्रक्रिया केलेली असते. प्रक्रियेमुळेच ती सुगंधी आणि चवीला चांगली लागते. पण अशाप्रकारच्या तंबाखूमुळे त्याचे सेवन वाढते’, अशी माहिती त्यांनी दिली.
औषधांच्या बदललेल्या किमतींविषयी बोलताना झगडे म्हणाले, ‘जुन्या किमतीवर बदललेल्या किमतींचे लेबल लावून औषधे विकता येतील. काही औषध कंपन्यांनी कमी झालेल्या किमतींची यादी विक्रेत्यांकडे पाठवली आहे,’ पुण्यात औषधांचा तुडवडा नसल्याचे ते म्हणाले.