पोपटराव पवार यांचे मत पुणे : पानिपताच्या युद्धात मराठे आपल्या प्राणांची बाजी लावून लढले. त्यांच्यामुळे परकीय आक्रमण भारतात येऊ शकले नाही. पानिपताचे युद्ध हा पराभव नाही तर आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक आहे, असे मत आदर्शग्राम हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. मराठा शौर्य दिनानिमित्त श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने पोपटराव पवार आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत अनुप्रिया पवार यांचा ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच त्यांची अष्टधान्य तुला करण्यात आली. त्यावेळी पोपटराव पवार बोलत होते. पवार घराण्याचा ऐतिहासिक निशाण ध्वज आणि शस्त्रपूजन करून मराठा वीरांना मानवंदना देण्यात आली. शिवजयंती महोत्सव समितीचे अमित गायकवाड, शिरीष मोहिते, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर पवार या वेळी उपस्थित होते.