नारायणगाव : जुन्नर-नाणेघाट मार्गावर असलेल्या खडकुंबे येथील लग्नसोहळ्यातील वऱ्हाडावर मधमाशांनी हल्ला केला. त्यामध्ये १९ जण जखमी झाले. ६ मे रोजी दुपारी अडीच वाजता हा प्रकार घडला. जखमींपैकी तिघांवर जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात, सात जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका बालकावर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अन्य जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

खडकुंबे येथील वधू आणि केवाडी येथील वर मुलाचा लग्नसोहळा खडकुंबे येथे ६ मे रोजी होता. लग्नमूहूर्त जवळ आला असतानाच लग्नमंडपाच्या परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाला दगड मारून कैऱ्या पाडण्याचा प्रयत्न एका अज्ञात व्यक्तीने केला. मधाच्या पोळ्याला दगड लागल्याने माशा उठल्या आणि त्यांनी वऱ्हाडाला लक्ष्य करीत चावा घेण्यास सुरवात केली. त्यामध्ये १९ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

जखमींना जुन्नर येथील शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये ३ लहान मुलांचा समावेश होता. त्यातील एक बालक गंभीर जखमी झाले असल्याने त्याला उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल सरदे यांनी सांगितले.