पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) दिव्यांग उमेदवारांचा दिव्यांगत्त्वाचा तपशील केंद्र सरकारच्या स्वावलंबन संकेतस्थळावरून विधिग्राह्य (व्हॅलिडेट) करणे आवश्यक केले आहे. १ मे २०२५पासून प्रसिद्ध होणाऱ्या सर्व पदभरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज करण्यासाठी दिव्यांग तपशील विधिग्राह्य असल्याशिवाय दिव्यांग उमेदवारांना कोणत्याही जाहिरातीसाठी अर्ज सादर करता येणार नाही, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

एमपीएससीने या बाबत परिपत्रकाद्वारे माहिती दिली. राज्य शासनाकडून २७ जून २०२४ रोजीच्या परिपत्रकाद्वारे दिव्यांग व्यक्तींना आरक्षणासह सर्व सुविधा व लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वावलंबन संकेतस्थळावरून वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी कार्ड) अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिपत्रकास अनुसरून आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या खात्यामध्ये दिव्यांग उमेदवारांचा वैश्विक ओळखपत्र क्रमांक नोंद करण्याची सुविधा या पूर्वीच उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याबरोबरच दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्या खात्यामध्ये दिलेला दिव्यांगत्वाचा तपशील केंद्र शासनाच्या स्वावलंबन संकेतस्थळावरून विधिग्राह्य (व्हॅलिडेट) करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

दिव्यांग तपशील विधिग्राह्य होण्यासाठी उमेदवारांनी स्वावलंबन संकेतस्थळावरून वितरित दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र क्रमांक अशा दोन्ही बाबी उपलब्ध असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी संबंधित दोन्ही तपशील नोंदविणे आवश्यक आहे. स्वावलंबन पोर्टलवरुन वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र नसलेल्या, पण राज्य शासनाच्या एसएडीएम संकेतस्थ‌ळावरून वितरित करण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनी एसएडीएम प्रमाणपत्रासह वैश्विक ओळखपत्रासाठीचा नोंदणी क्रमांक नोंदविणे अनिवार्य असेल. संबंधित उमेदवारांना मुलाखतीपूर्वी वैश्विक ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल. उमेदवारांनी खात्यामधील दिव्यांगत्वाचा सर्व आवश्यक तपशील अचूकपणे नोंदवावा. दिव्यांगत्वाचा तपशील नोंदविताना तो दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्रावर नमूद केल्याप्रमाणेच असल्याची खात्री करावी.

उदाहरणार्थ, दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक, दिव्यांगत्वाची टक्केवारी, वैश्विक ओळखपत्र क्रमांक, वैश्विक ओळखपत्र वितरणाचा दिनांक आदी तपशील वैश्विक ओळखपत्राप्रमाणेच असणे आवश्यक आहे. दिव्यांगत्वाचा सर्व तपशील अचूकपणे नोंदविल्यानंतर ‘व्हॅलिडेट’ या बटणावर क्लिक करावे. उमेदवाराचे वैश्विक ओळखपत्रावर नमूद नाव, दिव्यांगत्वाचा प्रकार व दिव्यांग स्थिती (कायमस्वरुपी/तात्पुरते) आदी तपशील दर्शविले जाऊन सदर तपशील अचूक असल्याचे उमेदवाराने संबंधित बटणावर क्लिक करून प्रमाणित केल्यानंतर दिव्यांग तपशील विधिग्राह्य करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे नमूद करण्यात आले आहे.

दिव्यांग तपशील विधिग्राह्य होण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी उमेदवाराच्या खात्यामध्ये नमूद जन्मदिनांक आणि वैश्विक ओळखपत्रासाठीचा जन्मदिनांक एकच असणे, तसेच दिव्यांगत्वाचा सर्व तपशील अचूकपणे नोंदविणे आवश्यक आहे. दिव्यांग उमेदवार त्याच्या खात्यामध्ये नोंदविलेला दिव्यांग तपशील केंव्हाही विधिग्राह्य करु शकत असला, तरी ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व दिव्यांग उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर दिव्यांग तपशील विधिग्राह्य करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.