भाजपच्या नेत्या, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी वाढत्या महागाई विरोधात निषेध व्यक्त केला. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गुंडागर्दी आहे असा आरोप करत आज अलका टॉकीज चौकात भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी जगदीश मुळीक म्हणाले “राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून वेळोवेळी गुंडागर्दी सुरू आहे. या गुंडागर्दीला सर्व सामान्य जनता वैतागली असून त्याचाच प्रत्त्यय स्मृती इराणीच्या कार्यक्रमात घुसून गोंधळ घातला.या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो”. आम्ही निवेदन देऊन आमचे म्हणण मांडणार होतो असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगितले जात आहे. निवेदन देणार होता तर अंडी,बांगड्या कशासाठी आणल्या होत्या असा सवाल देखील जगदीश मुळीक यांनी यावेळी उपस्थित केला.

आमच्या कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादीच्या महिलांनी गोंधळ घातला आणि आमच्या पदाधिकाऱ्यांवर विनयभंग सारखे गुन्हे दाखल केले आहे.यामुळे एखादा कार्यकर्त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. त्यामुळे हे गुन्हे मागे घ्यावे,अशी मागणी त्यांनी केली.तसेच आमच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिले सोबत जे घडले, त्याचे आम्ही समर्थन करीत नाही.अशी भूमिका मुळिक यांनी यावेळी मांडली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा कट रचून गोंधळ घालण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही केंद्रीय गृह सचिव यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.