राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना भाजपने विधान परिषदेत आमदार केले. मात्र, त्यांचे उमेदवारी अर्ज भाजपचे उमेदवार म्हणून भरण्यात आल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आकुर्डीत उघड केले. या नेत्यांचे स्वतंत्र अस्तित्वच नाकारण्यात आले असून सगळ्यांना एकत्र गुंडाळण्यात आल्याची खिल्ली त्यांनी उडवली. आश्वासने देऊन फसवल्याने सर्वाचा भ्रमनिरास झाला असून सरकार कोणाचेच नाही, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिल्याची टीकाही त्यांनी केली.

िपपरी शहर राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही इतर पक्षांची मदत घेतली होती. मात्र, त्यांचे अस्तित्व कायम ठेवले होते. मात्र, या सरकारने सगळ्यांना एकत्र गुंडाळले. ते आमचे काही करतच नव्हते, असे रडगाणे यांच्यातील एकाने आपल्यापाशी गायले होते. मात्र, ‘जाऊ दे, असं तर असं’ म्हणत आम्ही ते स्वीकारले, अशी पुस्तीही जोडली. रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या मागणीवरून अजितदादांनी त्यांची खिल्ली उडवली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. सरकार त्यांचेच आहे. कोणाच्या दबावाखाली चौकशी होता कामा नये, त्यामध्ये पारदर्शकता हवी. सत्य लोकांसमोर यायला पाहिजे. चिक्की आणि पदव्यांसारखे मंत्र्यांचे अनेक घोटाळे उघडकीस आले आहेत. जनमानसात सरकारची प्रतिमा डागाळली आहे. चांगले केले तर आम्ही केले, असे म्हणणारी शिवसेना ही भाजपला ‘ढुसण्या’ मारण्याचे काम करते. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीवरून भाजप-सेनेत जुंपली आहे. दोघांनाही मुंबईत सत्ता हवी आहे असेही ते म्हणाले.

राजीनामा देण्यास केव्हाही तयार

सहकारी बँकांच्या संचालकपदी अपात्र ठरविण्याच्या प्रक्रियेबाबतचा नवा कायदा झाला तेव्हापासून माझी कुठेही व एकही सही नाही. न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहतो आहे. राजीनामा द्यायला मी केव्हाही तयार आहे, मी सत्तेसाठी हपापलेलो नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली. त्या बँकेत माझेच बहुमत आहे. कोणतीही कामे करवून घेणे अवघड नाही. सुनावणीच्या तारखा पुढे जातात, ते काम वकील पाहतात. आम्ही ५५ जण आहोत. एकटा अजित पवार त्यात नाही. मात्र, फक्त अजित पवारच्या नावाची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये होते.