पिंपरी महापालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक कैलास कदम यांनी निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार भाजप युवा मोर्चाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. यासंदर्भात, योग्य ती चौकशी करावी व त्यात दोषी आढळून आल्यास कदमांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी त्यांनी आयोग व पालिका आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे.
भाजप युवा मोर्चाचे चिटणीस दत्ता इंगळे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. कैलास कदम यांनी स्वत:च्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीविषयी माहिती दडपली असून प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली आहे. त्याद्वारे त्यांनी राज्यशासनाची तसेच महापालिकेची फसवणूक केली आहे. याबाबतची सखोल चौकशी व्हावी, कदम यांचे पद रद्द करावे, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि महापालिकेडून देण्यात आलेले मानधन वसूल करण्यात यावे, अशी मागणी इंगळे यांनी केली आहे.