भाजपा नेत्यांकडून तसंत किरीट सोमयांयकडून होणाऱ्या संपत्तीसंदर्भातील आरोपांवरील प्रश्नावर उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माझी संपत्ती त्यांनी काय असेल ती घेऊन टाकावी असं म्हटलं आहे. मराठी माणसाच्या हातात पैसे खेळू नये यासाठी षडयंत्र आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या टीकेला किरीट सोमय्या यांनी पुणे विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे. संजय राऊत काय म्हणाले - “माझी संपत्ती त्यांनी काय असेल ती घेऊन टाकावी. तुमच्या संपत्त्या काय आहेत ते बघा. मी मराठी माणूस आहे, माझी महाराष्ट्रातच संपत्ती असायला हवी. पण ती नाहीय. मराठी माणसाच्या हातात पैसे खेळू नये यासाठी षडयंत्र आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. किरीट सोमय्यांचं उत्तर - "मराठी माणूस म्हणून मराठींना लुटायचं, त्यांची हत्या करायची. डेकोरेटला पकडून आणलं वैगैरे आरोप करतात. मुलीचं लग्न करा आमचं काही म्हणणं नाही. पण तुम्ही म्हणता डेकोरेटला पकडून आणलं. तुम्ही डेकोरेटला काय ते २५, ५० लाख पैसे दिल्याचं बिल असेल तर मीडियासमोर दाखवा," असं आव्हान किरीट सोमय्यांनी दिलं. दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. “महाराष्ट्राच्या जनतेने लोकांच्या जीवाशी खेळण्याचा ठेका उद्धव ठाकरेंना दिला आहे का? उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या मदतीने कोविडमध्ये लोकांच्या जीवाशी खेळण्याचं पाप केलं असून कारवाई झाली पाहिजे. मी आज पुन्हा एकदा पोलीस, महापालिका यांना आग्रह करणार आहे की, घोटाळा करणारी कंपनी हेल्थकेअर लाइफलाइन यांच्यावर कारवाई करा,” अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. “संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आली असेल तर…”; किरीट सोमय्या संतापले “गेल्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाने १०० गुंड पाठवले आणि तक्रार होऊ दिली नाही. कारवाई कशी होत नाही, पाहतोच,’” असा इशारा यावेळी त्यांनी दिला. पुढे ते म्हणाले की, “सत्काराला महत्व नाही. त्या कंपनीवर कारवाई करावी लागणारच आहे. संजय राऊतांना जाब द्यावा लागणार. संजय राऊत धमकी कोणाला देतात?”. “संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आहे की मी लोकांचा जीव घेणार. बोगस कंपन्याकंडून कंत्राट घेणार, महाराष्ट्रातील लोकांची हत्या होऊ देणार आणि त्यानंतर काही होणार नाही असं वाटत असेल तर ते मूर्ख आहेत. अनिल देशमुख जेलमध्ये गेलेत. संजय राऊतांचे मित्र, परिवार, पार्टनर यांच्यावर कारवाई होणारच,” असा विश्वास किरीट सोमय्यांनी व्यक्त केला आहे. . “ठाकरेंनीच हे सगळं घडवून आणलं. कंपनीला ब्लॅकलिस्ट उद्धव ठाकरेंनी केलं आणि आदित्य ठाकरेंनी त्यांना कंत्राट दिलं. पुणे महापालिकेत १०० लोक कसे घुसले? आज इतके पोलीस असताना त्यादिवशी का पळून गेले. एक पोलीस कॅम्पसमध्ये नव्हता. पालिकेत घुसणाऱ्या गुंडांचा व्हिडीओ पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांना दिसत नाही का? त्यांना अटक का झाली नाही?,” अशी विचारणा किरीट सोमय्या यांनी केला. हत्येचा प्रयत्न झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार यावेळी त्यांनी केला. अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना अशा धमक्या देऊन किरीट सोमय्या घाबरत असल्याचं वाटत असेल. यांच्यापैकी एकजण अनिल देशमुखांच्या खोलीत विराजमान होतील तेव्हा कळेल,” असा इशारा यावेळी त्यांनी दिला.