महाविकास आघाडीने वेदान्ताबरोबर केलेल्या कराराची प्रत जाहीर करावी; तसेच तळेगावमध्ये जागा दिल्याचा शासन निर्णय आणि जमिनीचा सर्व्हे नंबर दाखवावा, असे प्रतिआव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला शनिवारी दिले. शिवसेनेचे आंदोलन म्हणजे इव्हेंटबाजी असून सत्तेतून कमावलेला पैसा आंदोलनासाठी वापरत आहेत, असा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच ‘राजकीय बॉम्बस्फोट’ होणार असल्याचा दावाही केला.

हेही वाचा >>> “राष्ट्रवादी नव्हे, घराणेशाही पक्ष”; निर्मला सीतारामन यांचे टीकास्त्र

वेदान्ता प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी तळेगाव येथे केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते.बावनकुळे म्हणाले, की महाविकास आघाडीने वेदान्ताबरोबर केलेल्या कराराची प्रत, तळेगावमध्ये जागा दिल्याचा शासन निर्णय आणि जमिनीचा सर्व्हे नंबर दाखवावा. ही कागदपत्रे दाखवल्यास वेदान्ताचा प्रकल्प महाराष्ट्रातून जाण्यास आताचे सरकार जबाबदार आहे असे म्हणता येईल; पण कागदपत्रे न दाखवल्यास महाराष्ट्राची आणि पुणेकरांची दिशाभूल केल्याचे पाप महाविकास आघाडीला भोगावे लागेल.

हेही वाचा >>> शाश्वत विकासाची उद्दिष्टे विकास प्रक्रियेच्या केंद्रस्थानी ठेवावीत – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस सरकार असताना एकही महत्त्वाचा प्रकल्प बाहेर जाणार नाही, उलट मोठे प्रकल्प येतील. सध्याचे सरकार महाराष्ट्राच्या हिताचेच काम करेल, असे बावनकुळे म्हणाले.महाविकास आघाडीकडे सत्ता होती, तेव्हा काही कामे केली नाहीत. सत्तेचा वापर स्वतःसाठीच केला. आता आंदोलने करून सत्ता गेल्याचे दुःख बाहेर काढत आहेत. शिवसेनेचे आंदोलन म्हणजे इव्हेंटबाजी आहे. सत्तेतून कमावलेला पैसा आंदोलनासाठी वापरत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बारामतीतूनच बंद पडेल. त्यासाठीच आम्ही ३६५ दिवस अहोरात्र काम करणार आहोत. अजित पवार यांना गृहमंत्रिपद मिळाले नाही म्हणजे राष्ट्रवादीतच अंतर्गत धुसफूस आहे. राष्ट्रवादीत लवकरच राजकीय बॉम्ब फुटणार असून, अजित पवार यांनीच तसे संकेत दिले आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केला.

‘पीएफआय’वर बंदी घालण्याची मागणी
पीएफआयच्या आंदोलनप्रकरणी ते म्हणाले की, अशा संघटनांवर बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे’

हेही वाचा >>>अमली पदार्थ विक्री प्रकरणात परदेशी नागरिक गजाआड; सात लाखांचे मेफेड्रोन जप्त

खडसेंच्या घरवापसीचा प्रस्ताव नाही
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भेटीसंदर्भात बावनकुळे म्हणाले, की खडसेंना परत घेण्याबद्दलची चर्चा निरर्थक आहे. असा कोणताही प्रस्ताव नाही. ते शहांना का भेटले, भेटले किंवा नाही हे माहीत नाही. मी प्रदेशाध्यक्ष आहे, मला तरी कल्पना नाही.

ठाकरेंचा दसरा मेळावा म्हणजे ‘टोमणे सभा’
शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला होणारी उद्धव ठाकरे यांची सभा म्हणजे टोमणे सभा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चिखलफेक, आरोप केले जातील. बाकी बोलण्यासारखे आहेच काय, असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्राची जनता ही उद्धव ठाकरेंना गांभीर्याने घेत नाही, असा टोला मारला.