व्यंगचित्रकार राज ठाकरे यांचे मत आपल्याकडे संगीताची संस्कृती आहे, मात्र चित्रकला आणि व्यंगचित्रकलेच्या संस्कृतीचा अभाव आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केले. व्यंगचित्र दिसायला आणि बघायला सोपी असतात, पण विचार करायला आणि चितारण्याला अवघड असतात. या प्रक्रियेतून गेलो असल्याने मी हे ठामपणे सांगू शकतो, असेही ठाकरे यांनी सांगितले.प्रसिद्ध चित्रकार घनश्याम देशमुख यांच्या ‘बोलक्या रेषा’ या हास्यचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. ‘चिंटू’फेम चारुहास पंडित आणि व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे या वेळी उपस्थित होते. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना एकदाच राष्ट्रपती भवनात जाण्याचा योग आला. तेथील आवारामध्ये सर्व माजी राष्ट्रपतींची चित्रे लावण्यात आली आहेत. ही चित्रे मराठी चित्रकारांनी चितारली आहेत. ज्या सातवळेकर आणि आचरेकर यांनी ही चित्रे चितारली आहेत त्यांचे नाव इथे महाराष्ट्रात रस्त्यालादेखील दिले गेले नाही. कलाकाराच्या नावाने काही घडणारच नसेल तर संस्कृती येणार कोठून? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. कलानगरमध्ये माझे बालपण गेले. हेब्बर, धोंड, सातवळेकर, आडारकर, बेंद्रे असे ज्येष्ठ चित्रकार तेथे वास्तव्यास होते. हे सारे कलाकार चित्र काढत असताना मी सहजगत्या जाऊन त्यांचे रेखाटन पाहात असे. बालवयातील या संस्कारामुळे मी घडलो. शालेय शिक्षणापासून त्याची सुरुवात केली तर आपल्याकडे चित्रकलेची संस्कृती विकसित होईल, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक व्यंगचित्रकाराची वेगळी रेषा असते. घनश्याम देशमुख यांनी ब्रश मधामध्ये बुडवून रेषांचे फटकारे मारलेले दिसतात, असे चारुहास पंडित यांनी सांगितले. माझी राजकीय व्यंगचित्रे लवकरच समाज माध्यमावर दररोज सकाळी वृत्तपत्र वाचल्यानंतर माझा हात व्यंगचित्र काढण्यासाठी शिवशिवतो. पण, प्रसिद्ध करण्यासाठी व्यासपीठ नसल्याने चित्र काढायचा थांबतो, असे सांगून राज ठाकरे म्हणाले, माझे फेसबुक पेज करण्याचे काम सुरू आहे. राजकीय व्यंगचित्रे लवकरच समाज माध्यमावर दिसतील. सध्याची परिस्थिती पाहता असा हात चालविला पाहिजे. ठाकरे हे नाव असल्याने माझ्या चित्रांचा बाज थोडा वेगळा असतो. भूमिका घेण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत.