पुणे: स्वातंत्र्य दिनाला राज्यात अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

 देशाच्या मध्यवर्ती भागात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पामुळे राज्यात गेल्या आठवड्यापासून पाऊस होत आहे. बहुतांश भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये संततधार पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे विदर्भातही मुसळधार पावसाने हजेरी लावले आहे. गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला असला, तरी राज्याच्या विविध भागात हलका पाऊस सुरूच आहे. शनिवारीही राज्यात विविध ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कायम होता.

स्वातंत्र्य दिनालाही पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी या दक्षिण कोकणातील विभागात मुसळधार पाऊस होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधील घाट विभागात १५ ऑगस्टला जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई, पालघर, ठाणे, जळगाव, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अकोला, यवतमाळ आणि वाशिम  या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. मराठवाड्यातही हलका पाऊस होईल.