'भाजपा : काल आज आणि उद्या' या शांतनू गुप्ता लिखित व मल्हार पांडे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन मंगळवारी पुण्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमामध्ये फडणवीस यांच्यासोबतच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासहीत अन्य नेतेही उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणामध्ये चंद्रकांत पाटील यांनी भाजपा ही काही १९५१ साली स्थापन झालेला पक्ष नसून त्याला पाच हजार वर्षांचा इतिहास असल्याचं हिंदुत्वाचा संदर्भ देत म्हटलं आहे. यावेळी पाटील यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. "भाजपाबद्दल किती अज्ञान असावं. या पक्षाला पाच हजार वर्षाच्या हिंदुत्वाचा इतिहास आहे. हा विषय अज्ञानाचा असू शकतो. पण हा पक्ष ८० साली स्थापन झाला असे समजणारे खूप महाभाग आहेत ज्यांना टीव्हीवर रोज कव्हरेज मिळते. अशा लोकांना पक्ष ८० साली स्थापन झाला. ८० ला पक्ष स्थापन झाल्यानंतर त्याला आम्ही गावोगावी नेलं असं काहींना वाटतं. १९८८ ला त्यांचा पहिला आमदार झाला. त्या आमदाराची पार्श्वभूमी इथे मांडणं बरोबर नाहीय. मी त्या भागातला जिथं पहिला आमदार झाला," असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे लगावला. यापूर्वी अनेकदा राऊत यांनी शिवसेनेसोबत असल्याने भाजपा महाराष्ट्रामधील अनेक भागांमध्ये पोहचल्याचं वक्तव्य केलं आहे. "ज्यांना आम्ही पार्टी मोठी केली, गावोगावी नेली, आमच्यामुळे पार्टी मोठी झाली असं वाटण्याच्या स्थितीत हे पुस्तक प्रकाशित होतं आहे. त्यांना इतिहास माहिती नाही असं नाही. पण एक नवीन सिस्टीम तयार झालीय. एकाने सकाळी खोटं बोललं की मग दिवसभर त्याने तेच बोलायचं त्याला इकोसिस्टीम म्हणतात. मग ही इकोसिस्टीम अशी चालते की ते खोटं खरं वाटू लागतं," असा टोला पाटील यांनी भाषणादरम्यान लगावलाय. "या पार्टीला (भाजपाला) मोठा वसा आहे, या पार्टीला हात लावता येणार नाही हे माहिती आहे. अशावेळी ह ग्रंथ प्रकाशित झाला हे महत्वाचं आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाचं आहे. आम्ही केवळ १९५१ साली स्थापन झालेलो नाही आहोत. आम्ही केवळ १९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रेरणा घेऊन स्थापन झालेले नाही आहोत. आमची परंपरा पाच हजार वर्षांची आहे," असं पाटील यावेळी म्हणाले. "हिंदू विचार हा काही कोणी नव्याने मांडलेला नाहीय. परवा भगवाबद्दल कोल्हापूरबद्दल बोललं गेलं तेव्हा मी म्हटलं की, भगव्याचं कोणाला पेटंट दिलेलं नाहीय. भगवा रामाची पण पताका होती. श्री कृष्णाची पताका होती, छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा भगवा होता. पराक्रमचा भगवा आणि विरक्तीचा पण भगवा. तर या भगव्याचा पाच हजार वर्षांचा इतिहास केवळ मूर्ती पुजेशी जोडलेला नसून संस्कृतीशी, संस्काराशी जोडलेला आहे," असं पाटील म्हणाले.